मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,562 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 57,90,113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर गेला आहे.


तर राज्यात आज 143 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1525 रुग्ण तर धुळ्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


एकूण सात जिल्ह्यात रुग्ण संख्या 10 च्या खाली


धुळे 0, नंदूरबार 3 रुग्ण, भंडारा 4 रुग्ण, गोंदिया 5 रुग्ण, नांदेड 6, यवतमाळ 7 रुग्ण, वर्धा 9 रुग्णांची नोंद झाली आहे. तर धुळ्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.   


मुंबई आज 746 रुग्णांची नोंद, तर 13 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत गेल्या 24 तासात 746 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1295 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 94 हजार 82 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8582 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 728 दिवसांवर गेला आहे. 


देशात आज 50,040 रुग्णांची भर 


दोन दिवस रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत आल्यानंतर आज पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 50 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज सकाळच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर पडली आहे तर 1258 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो 96.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात अजूनही 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत.


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी दोन लाख 33  हजार 183 

  • कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी  95 लाख 51 हजार 029

  • एकूण सक्रिय रुग्ण :  पाच लाख  68 हजार 403

  • एकूण मृत्यू :  तीन लाख  95 हजार 751