Maharashtra Coronavirus : महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला 'उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे' (Places of Sensitive Origin) म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणांहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. आज याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. 








राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज  68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के  झाले आहे.


राज्यात आज मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. आज एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


मुंबई गेल्या 24 तासात 8479 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 8479 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाक 78 हजार 39 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्के आहे. सध्या 87 हजार 698 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 45 दिवस आहे.


पुण्यात आज 6434 रुग्णांची नोंद


पुण्यात आज 6434 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 56 हजार 636 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.