मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 61  हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे. 
 
राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 311  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,33,262 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 867  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 33 , 99, 355 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट


 कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठं यश आलंय. कोरोनाच्या महामारीच्या काळात मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरं जावा लागलं होतं. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळतंय. यातच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तिनशेहून कमी रुग्णांची नोंद झालीय. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचलाय. तर, आज केवळ एकाच व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमवलाय. 


महाराष्ट्रात 10 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पूर्ण


 महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली असून आतापर्यंत 10 कोटी लसींचा टप्पा ओलांडला आहे. देशातील लसीकरणाची स्थिती लक्षात घेता  हा एक प्रकारचा विक्रम केला आहे.  उत्तप्रदेशनंतर 10  कोटींचं लक्ष्य गाठणारं दुसरं राज्य आहे. तर मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आतापर्यंत  राज्यात एकूण 6 कोटी 80 लाख 53 हजार 77 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 3 कोटी 20 लाख 74 हजार 504 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.  मुंबईत सर्वाधिक 1 कोटी 49 लाख 92 हजार 825  डोस तर पुण्यात 1 कोटी 22 लाख 33 हजार 340 डोस दिले गेले. त्या खालोखाल ठाणे (84,37,825), नाशिक (48,76,948), नागपूर (45,54,264) चा क्रमांक लागतो.