Irsalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रात्रीतून दरड कोसळली आणि 16 जणांनी जीव गमावला. या घटनेमुळे माळीण  (Malin Landslide) आणि तळीयेच्या आठवणी जाग्या झाल्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या घटनेची माहिती जागेवर बसून मिळणं शक्य असताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मात्र त्या ठिकाणी जायचा निर्णय घेतला आणि प्रशासनाच्या बचाव कार्याला आपोआप वेग आला.


एकनाथ शिंदे यांनी या आधीही अशा अनेक घटनांच्या वेळी फ्रंटला जावून काम केलंय, प्रत्यक्ष ठिकाणी भेटी दिल्या आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकांना त्यांच्यात जावून एकनाथ शिंदे यांनी कसा धीर दिला हे या आधीही अनेकदा दिसलंय. मग ते बुलढाणा बस अपघात असो वा 2019 सालच्या पुरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस (Mumbai Kolhapur Mahalaxmi Express) असो, प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी आपली परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि आपली जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामाचा उदोउदो करण्याचा आमचा उद्देश नाही, पण एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल घ्यावी लागेल.   


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Raigad Irsalwadi Landslide) हे गाव. डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. एरव्ही या वाडीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत कसरतीचं काम, मग पावसाळ्यात तर त्याचा विषयच नाही. पण घटना घडल्याची माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत थेट या वाडीवर पोहोचले. 


खालापूर तालुक्यातील मालवली या गावातून इर्शाळवाडीकडे जाता येतं. पण या ठिकाणी जायचा रस्ता हा निसरडा आणि अत्यंत उतारीचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते. वरून कोसळणारा मुसळधार पाऊस, निसरडा रस्ता, गाड्या वा कोणतंही वाहन त्या ठिकाणी नेणं अशक्य. पण मग दुर्घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या वाडीवर चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रशासनही हललं. एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी या गावातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. 


2019 च्या पुरात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली अन् एकनाथ शिंदेंची धाव


2019 साली राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात या पावसामुळे हाहाकार उडाला होता. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूर (Kolhapur Sangli Flood) आला होता. त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत होतं आणि एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री होते. 


जुलै 2019 महिन्यात उल्हास नदीला (Ulhas River Flood) मोठा पूर आला होता. त्यावेळी मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी गाडी ही ठाणे जिल्ह्यातील वांगणीजवळ पुराच्या पाण्यात अडकली. त्या गाडीत जवळपास हजार प्रवासी होते. गाडीच्या सर्व बाजूने पाणी असल्याने तब्बल 12 तास गाडी जागच्या जागी थांबून होती. 


एकनाथ शिंदे यांनी वांगणीजवळ जाण्याचा निर्णय घेतला आणि बोटीतून प्रवास करत ते महालक्ष्मी एक्सप्रेसजवळ पोहोचले. त्यांच्यासोबत प्रशासन, आपातकालीन यंत्रणेतील कर्मचारी होते. लागोलाग त्यांनी सर्व प्रवाशांच्या जेवणाची सोय केली तसेच त्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही सोय केली. एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडून सर्व प्रवाशांना युद्धपातळीवर सोडवलं. 


नाशिक बस अपघाताच्या ठिकाणी तातडीने पोहोचले


एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आल्यानंतर ऑक्टोबर 2022 साली नाशिकमध्ये एक बस अपघात (Nashik Bus Accident) झाला. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली आणि जखमींना मदत कशी मिळेल याकडे पाहिलं. 


बुलढाणा बस अपघाताच्या ठिकाणीही धावले


काहीच दिवसांपूर्वी म्हणजे, 1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणानजिक बस अपघात (Buldhana Bus Accident) झाला आणि त्यामध्ये 25 जणाचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी लागोलाग भेट दिली. 


केरळ महापुराच्यावेळी विमानाने मदत घेऊन गेले 


2017 साली केरळमध्ये महापूर (Eknath Shinde Kerala Flood News) आला होता, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठी मदत केली. 100 डॉक्टरांचे एक पथक घेऊन एकनाथ शिंदेंनी विशेष विमानाने केरळ गाठलं आणि त्या ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना मदत केली. 


तसेच 2019 सालच्या कोल्हापूर-सांगली महापुराच्या वेळीही त्यांनी 15 दिवस या भागात ठिय्या मांडला आणि प्रशासन वेगाने हलवलं. रत्नागिरी-चिपळून (Chiplun Flood) या ठिकाणी आलेल्या महापुराच्या वेळीही एकनाथ शिंदे यांनी आठ दिवस या ठिकाणी थांबून रोगराई पसरणार नाही यासाठी प्रयत्न केले. भिवंडीतील इमारत दुर्घटनेवेळी एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहोचल्याचं दिसून आलं. 


मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी थेट भेट देत कामाचा आढावा घेताना दिसतात. मुंबई पावसाच्या नालेसफाईचा आढावा त्यांनी स्पॉटवर जावून घेतल्याचं दिसून आलं. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे एकनाथ शिंदे यांनी 80 च्या दशकात शिवसेनेत काम सुरू केलं. एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ग्राउंड लेव्हलवर काम करत अनेकांना मदत केली. दरम्यान, 2000 साली झालेल्या एका अपघातात एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आणि एकनाथ शिंदे खचले. पण आनंद दिघे यांनी दिलेल्या धिरामुळे ते पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले. यानंतर कुठेही काही आपत्ती किंवा वाईट घटना घडली, काही मदत लागली तर एकनाथ शिंदे तातडीने त्या ठिकाणी धाव घेतात. आताही इर्शाळगडावर पोहोचताच त्यांनी या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांना कामाला लावलं. जखमींवर उपचार सुरू केले, त्या लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देशही दिलेत. 


शिवसेना कार्यकर्ता ते मंत्री....  आणि आता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी यामध्ये कोणतीही संकुचित भूमिका घेतली नाही. अपघाताच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी लगेच पोहोचला की लोकांना धीर मिळतो, प्रशासनही जलद होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नेहमीच फ्रंटवर काम केल्याचं दिसून येतंय. आपत्ती कोणतीही असो, एकनाथ शिंदे यांच्यातील 'शिवसैनिक' जागा होतो आणि ते थेट स्पॉटवर पोहोचतात.


ही बातमी वाचा :