मुंबई : काल भूगोलाच्या पेपरचे गुण नेमके कसे द्यायचे याबाबत निर्णय झाल्याने यामुळे अनेकांचे संभ्रम दूर झाले. मात्र दहावी बोर्डाचा निकाल नेमका कधी जाहीर होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक तर लॉकडाऊनमुळे अनेक उत्तरपत्रिका तपासणीला उशीर झाल्याने उत्तरपत्रिका उशिरा तपासायला शिक्षकांकडे आल्याने हे काम तरी अंतिम टप्यात असलं तरी हे काम कधी पूर्ण होणार? आणि कधी दहावी निकालाची तारीख कधी जाहीर होणार? हे अद्याप ठरलेले नाही. साधारणतः 10 जूनपर्यंत दहावीचा निकाल अपेक्षित असतो. जेणेकरून विद्यार्थी अकरावी प्रवेशाची तयारी करू शकतील. पण यावर्षी हा निकाल पुढे जण्याची दाट शक्यता असून आम्ही लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे

अनेक रेड झोनमध्ये अजूनही पेपर तपासणीचा काम करण्यास अडथळे येत असून ते सोडविण्याचा काम सुरू आहे. 5 मे रोजी एक पत्रक काढून 10 वी 12 वी उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्या शिक्षकांना संचारबंदीच्या काळात पेपर तपासणीचा काम करण्याबाबत शिथिलता देण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी हे काम वेगाने जरी सुरू झालं असला तरी अनेक रेड झोनमध्ये पास मिळण्यास काही दिवस शिक्षकांना अडचणींना समोर जावं लागलं होतं. आता हे काम गतीने सुरू असून लवकरात लवकर दहावीचा निकाल जाहीर करण्याच काम शिक्षक करत आहेत. अनेक उत्तरपत्रिका शिक्षक, मोडरेटर, चीफ मॉडरेटरकडे तपासल्या जात असून भूगोलाच्या गुणांचा तिढा काल सुटल्याने आता निकाल नेमका कसा जाहीर करणार? हा प्रश्न सुटला आहे.

दहावी भूगोल पेपरच्या गुणांबाबत अखेर निर्णय; सरासरी पद्धत वापरणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर हा रद्द करण्यात आला होता. मात्र, हा पेपर रद्द झाल्यानंतर या विषयाचे नेमके गुण कसे द्यायचे ? याबाबत अखेर काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निर्णय घेतला. दहावी बोर्डच्या इतर विषयांचे लेखी पेपरचे गुणांची सरासरी काढून ही सरासरी विचारात घेऊन भूगोल विषयाचे 40 पैकी गुण दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करताना अनेकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर बोर्डाने हा संभ्रम पत्रक काढून दूर केला आहे.

मात्र, भूगोलाच्या पेपर बाबत बोर्डाने सरासरी गुण देण्याचा जो निर्णय घेतला आहे,तो मुख्याध्यापक, शिक्षक व अनेक पालक यांना अपेक्षित नव्हता. सरासरी ऐवजी जी 60 गुणांची समाजशास्त्र विषयाची नोंद असेल, त्यानुसार 560 गुणांची गुणपत्रिका निर्माण करायला हवी होती. कारण याबाबत अनेक पालक असंतुष्ट झाल्यास पुन्हा न्यायालयात धाव घेणार, त्यामुळे ही संभ्रमता दूर करणे अपेक्षित होते, मात्र बोर्डाने घेतलेला हा निर्णय तात्त्विकदृष्ट्या कुठेतरी अन्याय करणारा असा वाटतो. अस मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज व्यक्त केलं.

'दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात लागण्याची शक्यता फारच कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लाॅकडाऊनच्या काळात परीक्षक व नियामक यांच्याकडे पेपर पोहोचलेले नव्हते. आता परीक्षकांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. नियामकांकडे कामे शेवटच्या टप्प्यात आहे. यानंतरच दहावी निकालाचे काम पूर्ण होईल. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या राज्य मंडळाची कामे पुर्ण झाल्यावरच जुलै पहिल्या हप्त्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. यामुळे जुलै महिन्यात होणारी फेर परीक्षा घेणे कठीण आहे', असं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळचे माजी सदस्य उदय नरे यांनी वक्त केलं.