Bhiwandi Crime : भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याची हत्या झाली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे (Kailas Dhotre) यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर गुरूवारी एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे.


उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू


14 फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी नंतर शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे त्याचा मुलगा देवा तसेच इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते. दरम्यान उपचारा सुरू असताना संकेत भोसले याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे आणि चंदन गौड यांना यापूर्वी अटक केली होती. तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी बनविलेल्या पोलिस पथकाने रात्री उशिरा मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली आहे. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे यास अटक केली आहे. 


 


...तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटुंबीयांसह स्थानिकांची मागणी


दरम्यान हत्या करणारे आरोपी यांना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी मागणी कुटुंबीयांसह स्थानिकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्य बाळगून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवली होती. त्यांना या गुन्ह्यातील एकूण सात गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळाले असून या गुन्ह्यातील अजून काही फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. गुरुवारी दुपारी कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता या तिघांना 26 फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.



भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या, चार रिक्षा, सहा दुचाकी, एक मोबाईल जप्त


भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना शांतीनगर पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा, सहा दुचाकी, एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. भिवंडी शहरातील वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिल्या नंतर शांतीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार नाशिक मालेगाव येथील संशयित इसम मोहम्मद अरफाद मोहम्मद आरीफ अन्सारी (वय 21) रा.मालेगांव, जि. नाशिक हा भिवंडी परिसरात येऊन रिक्षा चोरी करीत असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले, त्यावेळी तपास केला असता त्याने भिवंडी, मानपाडा, डोंबिवली, मालेगांव अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा, एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अंसारी, (वय 22) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर, निजामपूर, भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या