Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत, वैजापूर हद्दीमध्ये मारहाण करुन शस्त्रांचा धाक दाखवत रोड रॉबरी करणाऱ्या चोरांचा पाठलाग करुन काही तासातच बेड्या ठोकल्या आहे. मात्र, एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कारवाई पोलिसांनी केली आहे. पुढे चोर मागे पोलीस, ठिकठिकाणी नाकेबंदी अन् स्वतः पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया वायरलेसवरून पोलिसांना सूचना करत कारवाईचं अपडेट घेते होते. एवढंच नाही तर पोलिसांनी अक्षरशः दोन किलोमीटर अंधारात पाठलाग करून, या चोरांना जेरबंद केले. 


शुक्रवारी रात्रीचे साडेअकरा वाजता डायल 112 वर माहिती मिळाली की, वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात रोडने जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना मारहाण झाली असून, पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी (क्रमांक- MH-23-AD-1216) ज्यामध्ये चार अज्ञात व्यक्ती आहे. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू असे घातक शस्त्र आहे. तसेच त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना मारहाण करुन त्यांच्या अंगावरील सोने व पैसे लुटुन नेले आहेत. ही बोलेरो गाडी लासूर स्टेशनच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला मिळाली. 


स्वतः पोलीस अधीक्षक वायरलेसवरून देत होते सूचना 


जबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी तात्काळ स्वतः वायरलेस द्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. याचप्रमाणे  वैजापूर उपविभागातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या. तसेच वैजापूर पोलिसांची तीन पथक तयार करून एक पथक शिवराई, करंजगांव भागाकडे रवाना केले. तर दुसरे पथक शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा वैजापुर येथे व तीसरे पथक गंगापूर चौफूली नाकाबंदीसाठी लावले. दरम्यान याचवेळी संशयित वाहनाने आंबेडकर चौकातील नाकाबंदी भरधाव वेगाने तोडून पुढे येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. 


दोन किलोमीटर पाठलाग करून मुसक्या आवळल्या! 


संशयीत वाहन नाकाबंदी भरधाव वेगाने तोडून निघाल्याने, वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपीनी त्यांचे वाहन पुरणगाव रोड नेऊन शेतीच्या कडेला लावून वाहन लॉक करून अंधारात शेताच्या  दिशेने पळ काढला. यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरू ठेवून अंधाऱ्या शेतामध्ये दोन किलोमीटर पर्यंत पळत जाऊन दोन चोरांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले.  तर दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19 वर्ष रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर) व कृष्णा प्रकाश भोळे (वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक)  असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांचे नावं आहेत. विशेष म्हणजे आरोपी पकडेपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः रात्रभर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तर कारवाईबाबत ते पथकांना मार्गदर्शन व सूचना देऊन सर्व परिस्थिती हाताळत होते. 


यांनी केली कारवाई! 


ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि मनोज पाटील, पोउपनि रज्जाक शेख, सफौ. महादेव निकाळजे, विठ्ठल जाधव, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, मपोना. सीमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar: रोजच्या चोरीच्या घटनांनी गावकरी वैतागले अन् थेट पोलिसांविरोधात उपोषणालाच बसले