Pune ATS, NIA Raids : एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी (maharashtra ATS, NIA module) उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे.  कारण एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने बरोडावालाचा एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली. 


पुण्याच्या कोंढवा भागातील या मुख्य रस्त्याच्या एक किलोमीटरच्या अंतरात इसिसची दोन वेगवेगळी मोड्यूल्स काम करत होती आणि त्यांना झुल्फिकार अली बरोडावयाला या आयटी इंजिनिअर कडून पैसे पुरवले जात होते. मुळचा ठाण्याचा असलेला बरोडावाला आयटी इंजिनियर असून गेली काही वर्ष पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत तो काम करत होता. एनआयएने 3 जुलैला टाकलेल्या धाडीत बरोडावाला याच्यासह तनीश नासीर सिद्दीकी, जुबेर नुर मोहम्मद शेख आणि शर्जील शेख या तिघांना अटक केली होती.  पुढे एनआयएने याच प्रकरणात 28 जुलैला डॉक्टर अदनान अली सरकार यालादेखील अटक केली. 


कोंढव्यात होता अड्डा?


पुण्याच्या कोंढवा भागातील ज्योती चौकाचच्या लागत असलेल्या या सोसायटीत अदनान अली सरकार राहायचा. त्या परिसरापासून जवळच त्याच्या भावाचा मेहुणा झुबेर नूर शेख राहायचा. तर इथून काही असलेल्या चेतना नगर मधून मोहम्मद युनूस साकी आणि मोहम्मद युसूफ खान यांना अटक करण्यात आली तर तिथून पुढं असलेल्या अशोका म्यूस सोसायटीत मन्सूर पिरबॉयसह अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तर याच परिसरातून काही अंतर पुढे पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेचं कार्यालय होतं. त्यामुळं दहशतवादी कामामध्ये गुंतलेल्या या दहशतवाद्यांचं परस्परांशी संबंध होते का? असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. 


पैसे पुरवणाराच जेरबंद अन्...


एटीएसच्या चौकशीतून मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी यांना मदत करणाऱ्या सीमाब काझी याला रत्नागिरीतून तर अब्दुल कादीर पठाण याला गोंदियातून अटक करण्यात आली. पुढे या दोघांच्या चौकशीतून ते दोघे बरोडावाला याच्या संपर्कात होते आणि बरोडावाल त्यांना पैसै देत होता हे समोर आलं. त्याचबरोबर इसीसीच्या या मोड्युलमध्ये अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावं, यासाठी त्याचा प्रयत्न सुरु होता.


3 जुलैला जेव्हा एनआयएने बरोडावला याच्यासह चौघांना अटक केली तेव्हा मिठानगरमध्ये दडून बसलेले तिघेजण धास्तावले. त्यांना मिळणारे पैसे थांबले. आर्थिक नाकेबंदी झाल्याने त्यांनी मध्यप्रदेशातील रतलाम या त्यांच्या मूळ गावी परत जायचं ठरवलं.  मात्र एनआयएने मोस्ट वॉंटेड असलेले फोटो प्रकाशित केल्यानं बस किंवा ट्रेननं प्रवास कारण त्यांना धोक्याचं वाटत होतं. त्यामुळं त्यांनी पुणे ते रतलाम प्रवासासाठी दुचाकीवरून प्रवास करायचं ठरवलं आणि त्यासाठी दुचाकी चोरताना ते पकडले गेले . मात्र या फरार दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याएवढा पैसा आयटी इंजिनियर असलेल्या बरोडावला यांच्याकडे कुठून येत होता याचा आता तपस केला जात आहे. त्याला पैसे पुरवणारी कोणती आणखी मोठी व्यक्ती यात गुंतलीय का? याचा यातून छडा लागणार आहे. 


एनआयए आणि एटीएसच्या चौकशीतून समोर येणारे धागे एकमेकांशी जुळत चालले आहेत. मात्र यामध्ये पुणे पोलीस दलातील दोन कॉन्स्टेबल्सनी मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना अटक करताना दाखवलेल्या हुशारीचा मोठा वाटा आहे. फक्त एक ते दीड किमोमीटरच्या अंतरात दडून बसलेले हे आरोपी आणि त्यांच्याकडून  सुरु असलेल्या कारवाया या एकाच कोणत्यातरी कटासाठी सुरु होत्या का? याचा आता तपास केला जात आहे.


हेही वाचा-


महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट