Maharashtra Assembly Session 2021 : आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.  अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.  


'भाजप आमदारांनी मला शिव्या दिल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला!': भास्कर जाधव


शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष  भास्कर जाधव यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भाजपा आमदारांनी केलं आहे.  जी घटना घडली ती मी सभागृहात सांगितली, फडणवीस यांना खोटं बोलण्याची सवय आहे. माझं म्हणणं आहे की आणखी आमदारांना निलंबित केलं पाहिजे, असं जाधव म्हणाले. पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की,  महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला, पंरपरेला आणि महाराष्ट्राच्या एक वैचारिक विचारसरणीला काळीमा फासण्याचं पाप भाजपाच्या आमदारांनी केलं. मी सभागृहाचं कामकाज संपवून सभागृह दहा मिनिटं स्थगित केलं. स्थगित केल्यानंतर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात. या उद्देशाने कुणीही न सांगता दहा मिनिटांसाठी मी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं, कारण मला देखील इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मी नुसता अध्यक्षांच्या दालनात आलो, तर त्यावेळी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार व नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडले, असं जाधव म्हणाले. 


31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं, तसेच स्वप्निलच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहा या प्रकरणी मोठी घोषणा केली. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. 


राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :