मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. 


राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


अजित पवार पुढे म्हणाले की, "काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही." 


एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.


MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे.  स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं.  पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. 


स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन विरोधकांनी अधिवेशनात राज्य सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी ही घोषणा केली. 


महत्वाच्या बातम्या :