Nagpur News नागपूर : नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी बोलताना विदर्भातील 62 जागांवर दावा केला होता. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या जागा आम्ही लढवणार, असे सुतोवाच नितीन राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना  संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी आज आपली प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू.


त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असे देखील ते म्हणाले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्यात विदर्भातील जागांवरू चांगलीच खडाजंगी रंगल्याचे बघायला मिळाले आहे. तर दुसरीकडे नितीन राऊत यांनी देखील शेरो शायरी करत संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


जिसके घर सिसेके होते है, वो दुसरोंके घरोपर पत्थर नही फेका करते- नितीन राऊत


आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात पवार गट, ठाकरे गट जर जागांवर दावा करत असेल तर पक्ष म्हणून आम्हालाही काही जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, हे संजय राऊत ठरवणार नाही. किंवा मिही देखील हे ठरवू शकत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत माध्यमात चर्चा करुन होत नाही. त्यासाठी पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांशी चर्चा करावी लागते. संजय राऊत यांनी आमच्या हायकमांडशी याबाबत बोलावं. शिवसेनेच्या सर्वेबाबत आम्हाला कल्पना आहे. मुंबईत ते सर्वे करत आहे. तसेच ते मराठवाड्यातंही सर्वे करत आहे.


महाविकास आघाडीने एक संयुक्त सर्वे करावा आणि ज्याच्या जास्त जागा सर्वेत दाखवेल त्यांनी त्या लढाव्या, असे आमचे मत आहे. तर विदर्भातील 62 जागा आमच्या बाजूनं आहे, हा आमचा सर्वे सांगतोय. त्यामुळे जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पत्थर नही फेका करते, असे म्हणत नितीन राऊत यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.


काय म्हणाले होते संजय राऊत? 


नितीन राऊत हे आमचे मित्र आहेत. विदर्भाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळं प्रेम आहे. तर त्यांना 62 जागा हव्या असतील तर बरं होईल, ते मग 62 जागावरच लढणार. काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू. त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असा मिश्किल टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना लगावला आहे. ते आज नागपूर येथे बोलत होते.


हे ही वाचा