Agriculture News in Nashik : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच्या प्रभावामुळं सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) बऱ्याच जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मात्र, या कमालीच्या थंडीतही ग्रामीण भागात बळीराजाला रात्रभर शेतात राबावं लागत आहे. कारण दिवसा विजेचं भारनियमन सुरु आहे आणि रात्री वीज शेतीसाठी वीज सोडली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून  (Maharashtra Assembly Winter Session) काहीतरी दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र,  राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा अधिवेशनात झाली नाही. त्यामुळं बळीराजा संतप्त झाला आहे. दरम्यान, बळीराजा सध्या कोण कोणत्या संकटाचा सामना करतोय पाहुयात त्याचा आढावा...


कडाक्याची थंडीत शेतकरी करतायेत रात्रीचा दिवस


नाशिकचा निफाड तालुका सध्या चांगलाच गारठला आहे. किमान तापमान सात अंशाच्याही खाली आलं आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीत देखील रात्रीचा दिवस करताना शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत. हाडं गोठवणाऱ्या या थंडीत रात्री ब्लॅंकेट अंगावर घेऊन सगळेजण जेव्हा साखर झोपेत असतात तेव्हा दुसरीकडे बळीराजा मात्र, याच रात्रीचा दिवस करत असतो. याला कारण ठरतय ते म्हणजे महावितरणकडून केले जाणारे वीज भारनियमन. दिवसा शेतीसाठी वीज सोडली जात नाही आणि रात्री शेतीसाठी वीज दिली जात आहे. त्यामुळं या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना जागूव रात्र काढावी लागत आहे.


बळीराजापुढं दुहेरी संकट 


पिकाला पाणी दिले नाही तर पीक वाया जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं या भागात बिबट्याचा वावर कायम असल्यानं रात्री शेतात राबताना बिबट्याची भीती अशा दुहेरी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. जोपर्यंत शेतकरी घरी येत नाहीत तोपर्यंत घरच्यांच्या मनात धाकधूक आणि चिंता कायम असते. 


रात्री 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंत वीज पुरवठा


नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे गावचे  शेतकरी आनंद मोगल यांनी आपल्या शेतात गहू आणि कांदा या पिकांची लागवड केली आहे. मोगल यांच्या शेतावर आठवड्यातील सोमवार ते गुरुवार दुपारचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यांना रात्री 11.55 ते सकाळी 8.55 या काळात शेतीसाठी वीज पुरवली जात आहे. त्यामुळं ऐन थंडीत स्वेटर, मफलर आणि पायात गमबूट घालून रात्री 12 च्या ठोक्याला ते घराबाहेर पडतात. मोटर सुरू करत पिकांना पाणी देण्यासह इतर मशागत त्यांना करावी लागत आहे.


अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे


अवकाळी पावसाचा धोका, शेतमालाला न मिळणारा भाव आणि महावितरणकडून अशा प्रकारे होणारी पिळवणूक या सर्व परिस्थितीमुळं बळीराजा हतबल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या या समस्येला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विशेष म्हणजे एकीकडं या सगळ्या अडचणींचा सामना शेतकरी करत असताना दुसरीकडं मात्र हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे कोणतेही नेतेमंडळी या प्रश्नांवर आवाज उठवत नसल्यानं शेतऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजेची समस्या, अवकाळी पावसाचे संकट, शेतमालालाही न मिळणारा दर या सर्व परिस्थितीला शेतकऱ्यांना सध्या सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांची आता एकच मागणी आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनात एकमेकांवर राजकीय चिखलफेक, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा आणि त्यांच्या पाठीशी उभे रहा. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture Update 2022 : वर्ष सरलं पण शेतीत काय घडलं? वाचा 2022 मधील कृषी क्षेत्रातल्या घडामोडी...