रत्नागिरी: महाड अपघातानंतर कोकणातल्या अनेक धोकादायक रस्त्यांचा एबीपी माझानं पंचनामा केला. कोकणाचं प्रवेशद्वार मानलं जाणाऱ्या कशेडी घाटाची अवस्थाच मोठी भीषण आहे. घाटातील सुमारे 100 मीटरचा रस्ता खचून गेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात या घाट खचतो, त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतात. पण रस्ता काही सुधारत नाही. गेली अनेक वर्ष हा नित्यक्रम सुरु आहे.


 



 

स्थानिकांना देखील हा रस्ता एखाद्या दिवशी घात करेल अशी भीती सतत वाटते. कशेडी घाट अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पण सुरक्षिततेची कुठलीच काळजी इथं घेतलेली दिसत नाही. घाटात एखादी गाडी बंद पडली तर, स्वतः पोलीस मदतीला धावतात. पण, रस्त्याच्या दुर्दशेमुळे आणि घाटामधल्या सुरक्षेच्या त्रुटींना पोलीसही आता वैतागले आहेत.

 

 



 

रस्त्याची दुरवस्था आणि निसर्गसौंदर्य पाहात आम्ही पोहोचले भरणे नाक्यावर. जगबुडी नदीवरचा पूल ब्रिटीशकालीन 15 पुलांपैकी एक. याची दुरवस्था पाहतानाच आमदार संजय कदमांची भेट झाली. यानंतर आम्ही भोस्ते घाटात पोहोचलो. या घाटाची परिस्थिती पाहून तर बोलतीच बंद होते.

 

भोस्ते घाटापासून चिपळूणपर्यंतचा रस्ता म्हणजे घाटच घाट. याच दरम्यान निसर्गसौंदर्यानं नटलेल्या परशुराम घाटातही दुरावस्थेची निराशादायक किनार पुन्हा समोर येते.

 



 

मजल-दरमजल प्रवास करत चिपळूण शहरात पोहचणं ही मोठी कसरतच. शहर सुरु होण्याआधीच रस्त्याची झालेली दुरवस्था स्थानिकांच्या मनात धडक भरवते.

 

पुढे चिपळूण शहरातल्या वशिष्ठी नदीवरचा पूल तर अंगावर काटाच आणतो. ब्रिटीशकालीन या पुलाची दुरवस्था आणि पर्यायी पुलाचं रखडलेल्या कामामुळं इथली वाहतूक कोंडी संयमाची परीक्षा घेते.

 

महाडपासून जेमतेम दोनशे किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी पूर्ण दिवस खर्ची घातला तरीही रत्नागिरी अजूनही 40 किलोमीटर दूर राहतो.

 

VIDEO: