रायगड : रायगड जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेला अनेक तास उलटले आहेत. अद्यापही या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 30 जणांचा आणि वाहनांचा शोध लागलेला नाही.  12 तासांच्या शोधकार्यानंतर दोन पुरुषांचे मृतदेह हाती लागले आहेत. अंधुक प्रकाशामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबवलं आहे.


 

 

एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून सकाळपासून बचावकार्य सुरु होतं. 18 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा ही मोहीम सुरु करण्यात येईल.

 

 

LIVE : महाड पूल दुर्घटना : मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल


सावित्री नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जात होता. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही. आपले नातेवाईक किंवा परिचित बेपत्ता असल्यास त्यांची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

 

 



 

 

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?


 

 

रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली.
या दुर्घटनेत 30 जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

 

 

साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि गेल्या तीन दिवसांपासून कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.

 

 

बचावकार्याला कोण कोण ?

 

*एनडीआरएफच्या चार पथकांकडून महाडमध्ये बचावकार्य. प्रत्येक पथकात 40 जणांचा समावेश.

 

*याशिवाय नौदल आणि तटरक्षक दलाचे जवानही घटनास्थळी.

 

*एनडीआरएफच्या 6 बोटी बचावकार्याला.

 

*रेल्वेकडून तातडीने मदत, रेल्वेचे डॉक्टर आणि बचाव दल घटनास्थळी

 

 

दोन जेमिनी बोट्स, 16 डायव्हर्स, दोन अधिकाऱ्यांसह 19 मार्को घटनास्थळी दाखल झाले आहेत. (सर्व फोटो नौदलाचं ट्विटर अकाऊण्ट)

 

 

 

महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार


 
बघ्यांची गर्दी

 
ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिसांची अर्धी कुमक या लोकांना हटवण्यातच खर्च होत होती. बचावकार्य सुरु असताना लोकांनी गर्दी कमी करुन बचावयंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं.

 
पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली

 

सावित्री नदीवरच्या दुर्घटनेने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. छोटी वाहनं माणगाव, बिरवाडे आणि दादली या 3 पर्यायी मार्गांनी वळवली आहेत.

 



 

 

महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता


 
संपर्कासाठी नंबर

 

 

राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1077 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

 
मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांचं महाडकडे लक्ष

 

 

महाडच्या दुर्घनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करु असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत बांधकाममंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

 
महाड दुर्घटनेत शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या घटनेकडे लक्ष ठेवून असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

 



 

विधानसभेत पडसाद

 

 

महाड दुर्घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. या दुर्घटनेबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटलांवर कलम 302 अंतर्गत खटला का चालवू नये, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. तर या संपूर्ण दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 

 
दुर्घटनाग्रस्त पुलाची गेल्या मे महिन्यातच पाहणी झाली होती. त्यावेळी पूल सुस्थितीत असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. असं निवेदन या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलं. त्यावर मे महिन्यात पाहणी करुन अवघ्या दोन महिन्यातच पूल कसा कोसळतो, असा सवाल विरोधकांनी केला.

 

 



 

सर्व पुलांचं ऑडिट करणार

 

 

या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर एकूण 36 लहान-मोठे ब्रिटीश कालीन पूल आहेत. ज्यांचं येत्या 15 दिवसात ऑडिट करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.