Lumpy Skin Disease : सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहे. कारण, जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy skin disease ) धोका वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. लम्पी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या पाच किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली आहे. हा आजार केवळ गाई आणि बैलांना होत असून, त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचं पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितलं.


समाज माध्यमात अफवा पसरवली जात असल्यास कठोर कारवाई


पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीनं आवाहन केले आहे की, राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्यानं प्रसार होत आहे. हा आजार केवळ गाई आणि बैलांना होत आहे. त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळं काही समाज माध्यमात अफवा पसरवली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल असे सिंह यांनी सांगितले. 


मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी


या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जन जागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लम्पी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस आणि औषधांची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन करावी. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम हाती घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


औषधांची फवारणी करावी


हा रोग माशा, डास, गोचिड इत्यादी किटकांमार्फत पसरत असल्यानं प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी सिंह यांनी सांगितले आहे.


नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित


शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करुन त्याअन्वये प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 (2009 चा 27) याची कलमे (6), (7), (11), (12) व (13) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लम्पी चर्म रोगाच्या बाबतीत 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गाय आणि म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो आणि म्हैस प्रजातीचा बाजार भरवणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इत्यादी बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


घाबरु नका काळजी घ्या


आयुक्त सिंह यांनी सांगितले की, हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात 70 हजार 181 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये 45 हजार 63, पंजाबमध्ये 16 हजार 866, गुजरातमध्ये 5 हजार 344 हरियानामध्ये 1 जार 810 जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळं तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सिंह यांनी पशुपालकांना केलं आहे. 


त्वरित उपचार सुरु केल्यास लम्पी स्कीन बरा होतो


लंपी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळं घाबरुन जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केलं. 


महत्त्वाच्या बातम्या: