Sharad Pawar : "काश्मीर मधून काश्मीर पंडित बाहेर पडले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्यावळी व्हीपी सिंह यांची सत्ता होती. भाजपचे त्यांना सहकार्य होते. म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. 


माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि रामराजे निंबाळकर उपस्थित होते. 


शरद पवार म्हणाले,  "विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु,  टीका करताना त्यात उद्वेष नसायाला हवा. मात्र अलीकडे ते पाहायला मिळत आहे.  राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय?  असं वाटत आहे. काश्मिरमधील एक घटक निघून गेला.  त्यावर एक सिनेमा आला, त्यानंतर काँग्रेसवर टीका झाली. परंतु, यामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं, समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते.  पंतप्रधानांकडून त्यावर भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पन्नी  केली जाते. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे."


"महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला फक्त स्वातंत्र्य दिले नाही तर देशाला दिशा दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाला महत्व प्राप्त करून देण्याचं काम केलं. आज आपल्याला देशाला एकसंघ ठेवायचं आहे, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.  


जयंत पाटील यांनीही यावेळी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "हल्ली विरोधक विधानसभा सुरू असताना काश्मीर फाईल्स बघायला गेले होते. नऊ वाजल्यानंतर सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी जाता आलं असतं. परंतु, हे विधानसभा सुरू असताना चित्रपट पाहण्यासाठी गेले. असले सिनेमे काढून पायात साप सोडायचं काम करतात आणि एकमेकांमध्ये बेकी निर्माण करतात.   यापासून सावध रहा." 


महत्वाच्या बातम्या