मुंबई: अजित पवारांनी 2019 साली जे बंड केलं त्यामागे सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरे यांचा, त्यांनीच पवार कुटुंब फोडलं, आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या वयावर सारखे तुम्ही बोलता, आता तुम्ही काय आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता की काय? असं म्हणत आव्हाडांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.


अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तटकरे, पवार साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं? अहो तुमच्या घरात सगळी मंत्रीपदं दिली आणि तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलता. आज तुमच्याकडे असलेले ऐश्वर्य, प्रतिष्ठा कुणामुळे मिळाली तर शरद पवार यांच्यामुळे मिळाली.


मला मिळणारे रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी तटकरेंच्या मुलीला दिलं


मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं. मैत्रीसाठी मला सोडून यांनी मुलीला पालकमंत्री केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगडचं पालकमंत्रीपद द्यायचं होते. पण ते अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही. मैत्रीला जागले दादा.2019 च्या अजित पवारांच्या बंडात सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरे यांचा. आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे. 


अजित पवारांना कुणी वेगळ्या मार्गावर नेलं असेल तर ते तटकरेंनी


अजित पवार यांना वेगळ्या मार्गावर जर कुणी नेलं असेल, त्यांना जर कुणी फोडलं असेल तर ते सुनील तटकरे यांनी असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तटकरे आता तुमच्या घरात काय सुरू आहे ते सांगा. तुमच्या घरात भाऊ-बहिणीमध्ये भांडण सुरू आहे. आता तुम्ही जे पवार कुटुंबात पेरलं, तेच तुमच्या घरात देखील उगवेल असंही आव्हाड म्हणाले. 


बंड केल्यानंतर अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणं चूक


2019 चे बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही एनसीपीची सगळ्यात मोठी चूक होती. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांच्या माणसांचा त्यांनी अपमान केला. दत्ता मेघे हे त्यापैकी एक उदाहरण आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवार, तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलले तर एका मिनिटात त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. 


भाजपमध्ये जाऊ असं म्हणत 2004 साली प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या मागे लागले होते असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


भुजबळांना इतकं बोलायला कुणी लावलं


छगन भुजबळ यांना इतकं बोलायला कुणी लावलं याचा शोध घ्यायला हवा असं म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 347 जाती आहेत ओबीसीमध्ये. त्यांचे प्रश्न तुम्हाला दिसतं नाहीत का? तुम्ही कॅबिनेट मध्ये जे बोलायला हवं होतं ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलता. महाराष्ट्रात तुम्हाला भांडण लावायची होती का? मग भूमिका घेतलीच होती तर मग आता यूटर्न का घेतला? 


ही बातमी वाचा: