ट्रक उलटून ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन चिमुरड्यांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2018 07:45 PM (IST)
जालन्यात चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे उसाचा ट्रक उलटला आणि त्याखाली दबून दोघा चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले
जालना : ऊसाचा ट्रक उलटून दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला गावाजवळ हा अपघात घडला. समर्थ साखर कारखान्याकडे जाताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि उसाचा ट्रक उलटला. यावेळी रस्त्यालगत खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या अंगावर ऊसाचा ढिगारा पडला. ढिगाऱ्याखाली दबून दोन्ही चिमुकल्यांचा अंत झाला. 5 वर्षीय सार्थक थेटे आणि 6 वर्षीय ओंकार चोरमारे यांना प्राण गमवावे लागले. घटनेनंतर अपघातस्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली.