जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन हे गेल्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्षं केलं. त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्प रखडला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.


एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले की, "1999 ला गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही पाडळसरे धरणाचं भूमिपूजन करून प्रत्यक्षात धरणाच्या कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर गेले 21 वर्षांचा कालावधी झाला. हे धरण अजून अपूर्ण आहे. हे धरण पूर्ण व्हावं म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्या. दुर्दैव असं की, "मागच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असतांनाही या धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष झालं. असं गिरीश महाजन यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टीका केली असून मी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पाटबंधारे मंत्री होतो. त्यावेळी अनेक धरणांच्या कामाला सुरुवात झाली होती." असंही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.


"भाजपमध्ये असताना हे धरणाचं काम सुरु झालं मात्र अजूनही धरण पूर्ण झालं नाही यावर बोलतांना एकनाथ खडसे यांनी झालं गेलं विसरून नव्यानं सुरुवात केली आहे. भाजपमध्ये मी 40 वर्ष होतो. म्हणून या धरण्याच्या कामाला सुरुवात झाली. 1997 ला या धरणाविषयी नागरिकांनी माझाकडे हे धरण झालं पाहिजे अशी मागणी केली होती. त्यावर मी नागरिकांना एक अट घातली होती की, तुम्ही माझा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला. तर मी तुमच्या धरणाच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत सुरुवात करेल. तसेच मी या परिसरातील नागरिकांना शब्द दिला होता की, जर हे धरण मंजूर झालं नाही तर आयुष्यात तुम्ही भाजपला एकही मत देवू नका. आणि मी आपणास तोंडही दाखवणार नाही. आणि आनंद या गोष्टीचा आहे की, जेंव्हा मी पाटबंधारे मंत्री होतो तेव्हा या धरणाला मंजुरी मिळाली, हे धरण पूर्ण झाल्यास मला आनंदच होईल." अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.


"विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान अमळनेर मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिल्यास हे पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अमळनेरमधून राष्ट्रवादीचे आमदार निवडून देखील आले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी त्यासाठीच जयंत पाटील यांचा दौरा आहे. की दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे आणि या कामाला वेग आणण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र बैठक घेतली आहे. काही तांत्रिक बाबींवर अडचणी आहेत. त्या सोडवून टेक्निकल बाबी क्लिअर झाल्या तर तीन चार महिन्यांत कामाला सुरुवात होईल. आणि बऱ्यापैकी निधी देखील उपलब्ध होईल." असे एकनाथ खडसे म्हणाले.


दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास परवानगी ठाकरे सरकारकडून मिळाली नव्हती. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरले आणि खाजगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. यावरुन सध्या गदारोळ सुरु आहे, यावर एकनाथ खडसे यांनी बोलणं टाळलं.


महत्त्वाच्या बातम्या :