जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यात दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जयंत पाटलांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळवारी दुपारी ते जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आलेले होते. याठिकाणी पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून 'आंदोलनजीवी' असा उल्लेख केला. हे चुकीचं आहे. भारताला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळालं आहे, हे मोदींनी लक्षात घ्यावं.", असं म्हणत जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला.


जयंत पाटील म्हणाले की, "दिल्लीत शेतकरी 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण राजा ऐकायला तयार नाही. राजा आपल्या मनाचेच करतोय, हे भारतातल्या शेतकऱ्यांना रुचलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून 'आंदोलनजीवी' असा उल्लेख केला. हे चुकीचं आहे. भारताला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळालं आहे, हे मोदींनी लक्षात घ्यावं.", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर टीका केली आहे.


...तर हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला असता : जयंत पाटील


जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, "दिल्लीत शेतकरी 60 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं सांगत आहेत. पण मोदींनी जर मागेच शेतकऱ्यांशी बोलणं केलं असतं, तर हा प्रश्न मागेच निकाली निघाला असता. मोदींनी राज्यसभेत भाषण करताना शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलनजीवी असा उल्लेख केला. आंदोलनजीवी म्हणजे, आंदोलनावर जगणारे असाही अर्थ होऊ शकतो. हे चुकीचे आहे. भारताला स्वातंत्र्य हे आंदोलनातूनच मिळालं आहे. मग ते महात्मा गांधींचे अहिंसक आंदोलन असो की, क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीला जर्जर करून सोडलेलं आंदोलन असो." असेही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


जयंत पाटलांनी नेते, पदाधिकाऱ्यांचे टोचले कान


चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी जयंत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत 'संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी' हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले, "एकेकाळी जळगाव जिल्हा 100 टक्के शरद पवारांना साथ देणारा जिल्हा होता. आता संपूर्ण राज्य पवारांच्या पाठीशी आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला. हे चित्र 2024 मध्ये बदलायला हवं. विधानसभा ही गोरगरिबांच्या दारात जाऊन, त्यांच्या पाया पडून, पायाला हात लावल्याशिवाय निघत नाही. विधानसभेची लढाई ही गरीब माणसांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घ्या. ते प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घाला. वजनदार कार्यकर्त्यांची वेगळी कार्यकारिणी करा. खालच्या कार्यकारिणीत तरुण पळणारे कार्यकर्ते असायला हवेत. 2024 मध्ये जळगाव जिल्ह्यातील चित्र बदलायला हवं, या अनुषंगाने प्रयत्न करा. दररोज रात्री मी झोपतो तेव्हा मला 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस आठवतो." असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.


पाहा व्हिडीओ : जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वात 'जयंत युवा किसान ट्रॅकटर मोर्चा'



''सगळे किल्ले ताब्यात, पण रायगड आपल्या ताब्यात नाही'' : जयंत पाटील


जयंत पाटील यांनी यावेळी स्थानिक नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मार्केट कमिटी, पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे. अमकी-तमकी संस्था आपल्या ताब्यात, पण रायगड आपल्या ताब्यात नाही, असं झालं आहे. "सगळे किल्ले आपल्या ताब्यात आहेत. परंतु मूळ राजधानी 'विधानसभा'च आपल्या ताब्यात नाही. विधानसभा ताब्यात घ्यायची असेल तर आपल्यात दुरुस्त्या करा, वस्तुस्थिती स्वीकारा, कार्यक्षम कार्यकर्त्यांना पुढे करा." अशा शब्दात त्यांनी नेत्यांना सूचना केल्या.


कार्यकर्त्यांची घेतली स्वतः बसून हजेरी : जयंत पाटील


जयंत पाटील यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना स्थानिक बूथ कमिट्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी बूथ प्रमुखांची उपस्थिती त्यांनी स्वतः बसून घेतली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :