मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. मुंबईत येत्या 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतचं 12 ते 24 तासात चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. हे चक्रीवादळ 3 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात मधून जाणार आहे. यासोबतच रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण मधून देखील जाणार आहे. या वायदळाचा परिणाम रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही जाणवणार आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. शिवाय, 26 जणांची एनडीआरएफ टीम दाखल झाली असून हे सर्वजण चिपळूण येथे आहेत. किनारी भागात सध्या सतर्क राहा असे आदेश देखील देण्यात आले आहेत. कोस्ट गार्ड देखील सध्या याबाबत काळजी घेताना दिसत आहे.

राज्य सरकारची तयारी
चक्रीवादळबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा फटका ज्या जिल्ह्यात बसू शकतो त्या जिल्ह्यात एक एनडीआरएफ (NDRF) टीम बोलवण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम पोहचल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात गेलेल्या बोटींना परत बोलवण्यात आल्या आहेत. पुढची सूचना येईपर्यंत बोटी समुद्रात जाऊ शकणार नाही. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवब्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पालघर जिल्ह्याला चक्रीवादळाचा धोका!
अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवदळाचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफ प्रमुख बी शिवप्रसाद राव हे आपल्या तुकडीसह सध्या पाहणी करत आहेत. तर तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालंय.

Monsoon | केरळमध्ये मान्सूनचं आगमन तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

चक्रीवादळाच्या कालावधीत प्रामुख्याने चार कृतीत विभागनी करण्यात आली आहे. यामध्ये चक्रीवादळ येण्याच्या निकटपूर्वी, जेव्हा चक्रीवादळाची सूचना आणि इशारा देण्यात येतो, जेव्हा घरे रिकामी करण्याचा सल्ला देण्यात येतो, जेव्हा चक्रीवादळाने किनारपट्टी पार केलेली असते.

चक्रीवादळ येण्याच्यापूर्वी घ्यायची काळजी

  • घराची तपासणी करावी. सुटे सामान सुरक्षित ठेवावे, दरवाजे व खिडक्या दुरूस्त करून घ्याव्यात,

  • घराच्याजवळ असलेले वाळलेले लाकूड किंवा वाळलेली झाडे काढून टाकावीत.

  • जोराच्या वाऱ्याने उडून जाऊ शकतात अशा ओंडक्यांच्या राशी, सुट्या पत्र्याचे निवारे, सुट्या विटा, कचऱ्याचे डबे, नामफलक वस्तू बांधून ठेवाव्यात.

  • काही लाकडी फळ्या तयार ठेवाव्यात, त्यामुळे जर आवश्यकता पडली तर काचेच्या खिडक्यांना आच्छादित करता येईल.

  • केरोसिनने भरलेला मोठ्या वाऱ्यात सुध्दा न विझणारा दिवा (कंदिल) बॅटरीवर चालणारी विजेरी आणि पुरेसे (ड्रायसेल) शुष्क घट तयार ठेवावेत.

  • मोडकळीस आलेल्या इमारती पाडून टाकाव्यात.

  • ट्रान्झिस्टर (रेडिओ) करिता काही जास्त बॅटऱ्या ठेवाव्यात.

  • संकटकालीन वापराकरिता कोरडे खराब न होणारे खाद्यपदार्थ नेहमीच तयार ठेवावेत. से खबरदारीचे उपाय नागरिकांनी करावे,असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.


जेव्हा चक्रीवादळ सुरू होते तेव्हा

  • हवामान विभागाच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवावे त्यामुळे चक्रीवादळाच्या आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहता येईल.

  • अफवांकडे लक्ष देऊ नका आणि त्या पसरवू नका यामुळे घबराट निर्माण होणार नाही.

  • लक्षात ठेवावे की, चक्रीवादळाची सूचना प्राप्त होणे याचा अर्थ पुढील 24 तासांमध्ये धोका आहे. सावध रहावे.

  • जेव्हा तुमचे क्षेत्र हे चक्रीवादळाच्या धोक्यात सापडते तेव्हा खाडी, किनारे किंवा किनाऱ्यालगतचे इतर पाणथळ क्षेत्रे यांपासून दूर जावे.

  • उंचावरील ठिकाणी किंवा आश्रयस्थळी जाण्याचा मार्ग पाण्याखाली येण्यापूर्वीच बाहेर पडावे.

  • वेळ घालवू नका आणि धोका पत्करू नका.

  • जर तुमचे घर उंचावरील जागेवर सुरक्षितपणे बांधण्यात आलेले असेल तर घराच्या सुरक्षित भागात आश्रय घ्यावा. तथापि, जर ती जागा सोडण्यास सांगण्यात आले तर, तसे करण्यास मागे पुढे पाहू नका.

  • खिडक्यांच्या काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालून ठेवाव्यात.

  • बाहेरील दरवाजांना मजबूत योग्य टेकू द्यावा. शिजवल्याशिवाय खाता येईल असे जादा खाद्यपदार्थ आणून ठेवावे. योग्य रितीने केलेल्या पात्रांत जादा पिण्याचे पाणी साठवून ठेवावे.

  • मोठया वाऱ्यातसुध्दा न विझणारा कंदील, विजेच्या आणि इतर संकटकालीन प्रकाश देणारी उपकरणे चालू स्थितीत ठेवावीत आणि हाताशी ठेवावी.

  • लहान मुलांसाठी व प्रौढ व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा.

  • जर चक्रीवादळाचा केंद्रबिदु हा प्रत्यक्ष तुमच्या घरावरून जात असेल तर, वारा शांत असेल आणि पाऊस अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त पडेल या वेळेत बाहेर पडू नका. कारण त्यानंतर लगेचच विरुध्द दिशेने जोरदार वारे वाहू लागतील.

  • तुमच्या घरातील मुख्य विद्युत जोडणी बंद करावी. तसेच नागरिकांनी अशा परस्थितीत शांतता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

  • जेव्हा घर सोडण्याची सूचना दिली जाते तेव्हा पुढील सूचनाचे पालन करावे.

  • तुम्ही स्वत: व तुमचे कुटुंब यांकरिता काही दिवस पुरेल इतके आवश्यक सामग्रीची बांधाबांध करावी. तसेच औषधे, मुले, प्रौढ व्यक्ती यांकरिता खाद्यपदार्थ बांधून घ्यावे.

  • तुमच्या क्षेत्राकरिता सूचित करण्यात आलेल्या योग्य आश्रयाच्या किंवा निर्वासनाच्या ठिकाणी जावे.

  • तुमच्या मालमत्तेबाबत काळजी करू नका.

  • आश्रयाच्या ठिकाणी असलेल्या प्रभारी व्यक्तीच्या सूचनांचे पालन करावे.

  • तुम्हाला जाण्याची सूचना मिळेपर्यत आश्रयाच्या ठिकाणीच रहावे.


चक्रीवादळानंतरच्या करण्याच्या उपाययोजना

  • तुमच्या घरी तुम्ही परत जाऊ शकता अशी सूचना देण्यात येईपर्यत तुम्ही आश्रयाच्या ठिकाणीच रहावे.

  • तुम्ही रोगप्रतिबंधक लस त्वरीत टोचून घेतली पाहिजे.

  • दिवाबत्तीच्या ठिकाणापाशी खुल्या असलेल्या लांबकळणाऱ्या तारांना चुकू नही स्पर्श करू नये.

  • जर तुम्हाला वाहन चालवावे लागत असेल तर, वाहन काळजीपूर्वक चालवावे.

  • तुमच्या जागेतील दगडमातीचे ढिगारे त्वरीत साफ करावेत.

  • झालेल्या नुकसानाचा अचूक अहवाल योग्य प्राधिकाऱ्यांना द्यावा.

  • तसेच चक्रीवादळाच्या कालावधीत काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 02525-297474/ 02525-252020 तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, विवेकानंद कदम यांना 8329439902 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.


अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र, चक्रीवादळ दोन दिवसात मुंबई, गुजरातच्या किनारी धडकणार?