मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयच्या तपास कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेहमीच्या स्थितीवर कोर्ट नाराज असून तुम्ही हा तपास संपवणार आहात का, आणखी किती दिवस तपास संपण्याची वाट पाहायची, असा सवाल हायकोर्टाने केला आहे. कोर्टाने अनिश्चित काळासाठी तुमची कारवाई संपण्याची वाट पाहायची का, सीबीआयकडून कसलीही माहिती मिळत नसल्याचंही हायकोर्टाने म्हटलं आहे.
या असमाधानकारक कामामुळे कोर्टाला केवळ प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशा शब्दात हायकोर्टने कामाकाजावर ताशेरे ओढले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवण्यासाठी गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांनी परस्पर समन्वयाने युकेत संपर्क साधून काम करावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
यापुढील अहवाल सीबीआयच्या सहसंचालकांनी अहवाल कोर्टाला सादर करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. 16 डिसेंबरला सीबीआय सहसंचालकांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान अशीच परिस्थिती राहिली तर सामाजिक बदल कधीच होणार नाही, अशा शब्दात हायकोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ओंकारेश्वर पुलावर नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी सापडत नसल्यानं सरकार आणि पोलिसांवर टीकाही झाली. आता दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झालं आहे, मात्र अजूनही कॉम्रेड गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गीचे मारेकरी मात्र सापडले नाहीत.
संबंधित बातम्या: