Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच राज्यातून परत उत्तराखंडला जाणार अशी चर्चा सुरु असतानाच आता एबीपी माझाच्या हाती एक वेगळीच माहिती लागली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरुद्ध सुरु असलेला विरोध पाहता राज्यपालांना गुजरात निवडणूकीनंतर पदमुक्त केलं जाण्याची चर्चा आहे. मात्र राज्यापालांच्या जवळच्या लोकांनी एबीपी माझा माहिती दिली आहे की, राज्यपालांना जर गुजरात निवडणूकीनंतर पदमुक्त केलं तर त्याचं कारण राज्यपालांचा विरोध नसून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेला मान देत निर्णय घेण्यात येईल.

  


काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मुंबई दौरे पार पडला त्याचवेळी राज्यपाल यांनी आपल्याला पदमुक्त करा अशी विनंती केल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिलीय. आपलं उर्वरित आयुष्य आपल्या राज्यातील जनतेसाठी खर्च करावं अशी आपली इच्छा असल्याचं देखील त्यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे. उत्तराखंड मधील पित्तोरागढची ही आहे शेर सिंग कारकी शाळा. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शाळेचं काम वाढवण्याची तयारी केल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. 81 वर्षाचे  राज्यपाल महाराष्ट्रातून थेट उत्तराखंडला जाऊन आपल्या शाळेचं काम पाहणार आहेत. तसा प्लॅन त्यांनी चार महिने आधी राज्यातील सध्याच्या विरोधी वातावरणापुर्वीच केल्याची माहिती आहे.  निवृत्तीनंतरच आयुष्य आपल्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यात आपल्याल जास्त आनंद आहे. सातत्याने होणाऱ्या टीकेपेक्षा शिक्षक म्हणून काम करण आपल्याला केव्हाही आवडेल अशी भावना राज्यपालांची असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय.


कोण आहेत कोश्यारी?
उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्याचे रहिवासी
अलमोडा कॉलेजमधून इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण
1961 सालापासून विद्यार्थी संघटनेत सक्रिय
उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री
उत्तरांचल प्रदेश क्यो?, उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान पुस्तकाचे लेखक
आणीबाणीच्या काळात 3 वर्ष तुरुंगवास
1997साली विधानपरिषद सदस्य तर 20008 साली राज्यसभा सदस्य
उर्जा जलसिंचन मंत्री, विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली


मागील काही दिवसांपासून सातत्याने राज्यपालांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सत्ताधारी भाजपची सातत्याने अडचण होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सद्याचं राज्यपाल विरोधाचं वातावरण निवळल्यानंतर राज्यपाल पुन्हा स्वगृही परतणार अशी चर्चा होती. त्यातच आपल्यालाच माघारी जाण्याची इच्छा असल्याची बातमी समोर आली आणि चर्चांनी वेग पकडला. दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे असोत की संभाजीराजे छत्रपती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष यांनी जोरदार राज्यपाल परत जाओ अशी मोहिम सुरु केलीय. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना तुमच्या भावना योग्य ठिकाणी पोहचवल्याची प्रतिक्रिया दिलीय त्यामुळे राज्यपाल परतणार हे मात्र नक्की झालंय तत्पुर्वीच राज्यपालांनी आपली सोय लावून ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


आणखी वाचा:
Bhagat Singh Koshyari: गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी?