मुंबई : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुलावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असं असलं तरी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.


महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च महिन्यापासून पासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मार्च महिन्याच्या वेतनाचा पहिला टप्पा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.


एप्रिल महिन्यात मार्च महिन्याच्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा आणि एप्रिल महिन्याचा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन बिले तयार करावी लागल्याने बिले तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या 10 टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन बिले तयार करण्यामुळे वेतन देण्यास आणखी विलंब झाला असता. त्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मार्च 2020 महिन्याचे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी देणे करणे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येतील, असं वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


संबंधित बातम्या







Corona Ground Report | कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट! काय म्हणतोय गावाकडचा कोरोना?