Gadchiroli Naxal गडचिरोली : गडचिरोलीच्या (Gadchiroli News) भामरागड तालुका मुख्यालयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरील आरेवाडा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. यात एका व्यक्तीची माओवाद्यांनी (Naxal) हत्या केली असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे.


जयराम कोमटी गावडे (वय 38) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून ही हत्या केलीय. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण व्हावी, या अनुषंगाने मृतदेह मुख्यरस्त्यावर आणून ठेवला आहे. ही घटना उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.    


शहीद सप्ताह निमित्या घातपाताचा डाव


नुकतेच छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. परिणामी, नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा माओवाद्यांच्या घातपाताच्या घटना उजेडात आल्या आहेत. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एक इसमास बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केलीय.


ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई करत मृतदेह घटनास्थळावरून भामरागड रुग्णालयात आणले आहे. अशातच, 28 जुलै पासून 3 ऑगस्ट पर्यत माओवादी संघटनेचं शहीद सप्ताह साजरा करत असतात. अशातच ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. 


गोळी हातातून आरपार गेली, तरीही दिला तब्बल सहा तास लढा


छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या भीषण चकमकीत प्रथम नक्षलवाद्यांनी सी- सिक्सटी च्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीच्या  पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटात विवेक शिंगोळे आणि शंकर पोटावी हे ही जखमी झाले. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातातून गोळी चक्क आरपार निघाली.


साधारणपणे अशा स्थितीत जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकरी आणि C-60 त्यांचे ऑपरेशन मागे घेऊन जखमींना सुरक्षित बाहेर काढते. मात्र, त्या दिवशी हातातून गोळी आरपार होऊनही शंकर पोटावी याने आपल्या सहकाऱ्यांना सोडून सुरक्षित बाहेर जाण्यास नकार दिला आणि जखमी अवस्थेमध्ये ही नक्षलवाद्यांशी पुढील सहा तास लढा सुरू ठेवला. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारावर नक्षलवाद्यांचा घेरा तोडून दाखवला.


हे ही वाचा :