धुळे : धुळे तालुक्यातील खोरदड तांडा येथील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी तेथील समाजबांधव दीपक सोमा राठोड यांच्या कुटुंबासह पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याने हे पाचही कुटुंब गावाबाहेर राहत आहेत. त्यामुळे दीपक राठोड यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून ट्वीट करुन न्याय देण्याची विनंती केली होती. गृहखात्याने या ट्वीटची दखल घेत पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.





खोरदड तांडा गावातील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याने ते सध्या गावाच्या बाहेर राहत आहेत. पीडित कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु न देणं, गावात किराणा, औषधं खरेदी करु न देणं, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणं, समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी यात हजर राहू न देणे, मुला-मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबांना खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच केल्याची व्यथा दीपक राठोड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मांडली. 14 सप्टेंबर 2019 ते 28 मे 2020 पर्यंत हा छळ झाल्याचं दीपक सोमा राठोड यांनी तक्रारीत म्हटलं आहे.



वर्षभरापूर्वी विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला दीपक राठोड याचे वडील सोमा राठोड यांनी जामीन दिला होता. याचा राग जातपंचायत सदस्यांना आला, त्यातून त्यांनी समाजातून बहिष्कृत केल्याची आपबिती दीपक राठोड याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपुढे कथन केली. विशेष म्हणजे जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या पाच कुटुंबात विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कुटुंबाचा देखील समावेश असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.