Fire Accident: राज्यात गेल्या काही तासात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू असताना त्यावर विरजण घालणारा प्रकार मुंबई उपनगरातील चेंबूर (Chembur) परिसरात घडला आहे. यात एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे सिद्धार्थ नगर परिसरात ही दुर्घटना घडली. येथील चाळीत अनेक वन प्लस वन स्ट्रक्चरची घरे आहेत. यापैकी एका घराला अचानक आग (Fire Accident) लागली. या घरातील कुटुंबीयांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला.


यामध्ये 7 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर अशीच एक आगीची घटना सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइमध्ये घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर आणखी एक घटना नागपुरात देखील घडली आहे.


नागपुरातील एम्प्रेस मॉलमध्ये आग,कपड्याच्या दुकानांचे नुकसान 


नागपुरातील एम्प्रेस मॉलमधील ग्राऊंड फ्लोअरवरील दुकानाला  काल, शनिवारच्या रात्री अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार शॉक सर्किटमुळे आग लागली असल्याचं बोललं जात आहे. आग लागली त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकं मॉलमध्ये असल्याने एकच खलबळ उडाली. दरम्यान, एकच पळापळ सुरू झाल्यानं सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मॉलच्या बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ अग्निशामक विभागाचे तीन बंब पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही वेळात यश मिळाले. मात्र कपड्याच्या दुकानाची ही आग लगतच्या दोन ते तीन दुकानांमध्ये पसरली आणि त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेला नाही. मात्र या आगीने सर्वत्र खळबळ पसरली होती.


सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइत अग्नितांडव 


दरम्यान, अशीच एक आगीची घटना सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइमध्ये घडली. शनिवारच्या रात्री ही अचानक आग लागली. या आगीत अनेक भाजीची दुकाने जळून खाक झाली. यात शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,पहाटे ही आग आटोक्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास पाचगणी पोलीस करत आहेत.


हे ही वाचा