नांदेड : आई संपावर जाणे आणि शेतकरी संपावर जाणे सारखेच आहे. शेतकरी संपावर गेला, ही बाब आमच्या सरकारसाठी भूषणावह नाही, अशा भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. नांदेडमध्ये ते एबीपी माझाशी बोलत होते.


“आजवर राज्यात शेतकरी हिताच्या धोरणांची गती अत्यंत धीमी होती. पण मागील अडीच वर्षांच्या काळात ही गती वाढली. कर्जमुक्तीऐवजी भविष्यात शेतकरी कधीच कर्जाच्या दुष्टचक्रात अडकू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.” असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बळीराजाच्या संपामुळे शहरातील जनता गॅसवर

दुसरीकडे शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी

  • शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा

  • शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा


मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.

संबंधित बातम्या :

आज मी अस्वस्थ आहे : शरद पवार

शेतकरी संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण

शेतकरी संपावर, दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या

शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले