अहमदनगर : राज्यावर अस्मानी संकट आहे. मात्र, सरकारप्रती  विश्वास हरवतो. राजकीय सत्तांतरण होतं आहे. मात्र, नोकरवर्ग तोच असून समन्वय वाढला पाहिजे. सर्वजण प्रयत्न करत आहेत. पण तरीही नाम संस्थेला हे काम करावा लागतं आहे. हे दुर्दैवी असल्याचं प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.


 

अहमदनगरमध्ये नाम फाऊंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी  118 आत्महत्याग्रस्तना कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजाराची मदत करण्यात आली.

 

यावेळी नाना पाटेकर यांनी दारुबंदीसह कर्जमाफी, हमीभाव आणि महिलांच्या मंदिर प्रवेशावरही रोखठोक भूमीका मांडली. बिहार, गुजरात या राज्यांमध्ये दारुबंदी होते तर महाराष्टात का नाही, असा सवालही नानानं उपस्थित केलाय.

 

“कर्जमाफीसाठी निकष ठरवून सुवर्णमध्ये काढा”

 

सरसकट कर्जमाफी देण्याऎवजी निकष ठरवण्याची मागणीही नानांनी केली. गेल्यावेळी कोरडवाहू बरोबर  सधन शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं कर्जमाफीसाठी निकष ठरवून सुवर्णमध्य काढण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

मंदिर प्रवेशासाठी सर्वांना समान हक्क असायला पाहिजेत – नाना

 

यावेळी नानांनी महिलांच्या मंदिर प्रवेशावरही खड़ेबोल सुनावले. देव हा मंदिरात नसून निसर्गात आहे. मात्र, मंदिरात सर्वाना समान हक्क असायला पाहिजेच. देवळात कोणी कुठं जायचं नाही, हा विचित्र वाद आहे. त्यावर  बोलावंसही वाटत नसल्याची खंत नानांनी व्यक्त केली आहे.

 

आता हमीभावासाठी लढा – नाना

 

यावेळी नानांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशाही स्पष्ट केली. पावसाळ्यानंतर नाम फाऊंडेशन उत्पादनाच्या हमीभावासाठी पुढाकार घेणार असल्याचं नानानी म्हटलं आहे.