ठाणे : ईव्हीएम हे पराभवाचं कारण असू शकत नाही, पराभव मान्य करून आणि चुका सुधारून पुन्हा लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, कारण पराभव हा पराभव असतो, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.


ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांची शरद पवारांनी भेट घेतली. काँग्रेसशी मजबूत युती झाली असती तर आणखी ठिकाणी विजय मिळाला असता, हे देखील पवारांनी मान्य केलं.

दरम्यान ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप भाजपवर होत असताना शरद पवारांनी मात्र भाजपला सुखद धक्का दिला आहे. अनेक सहकारी पक्ष सोडून गेल्याने झळ बसली. तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यातला पराभव धक्कादायक होता, असंही पवार म्हणाले.

मुंबई महापालिकेत भाजपचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, अशी खात्री झाल्याने किंवा सत्ता वाचवण्यासाठी भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा, असा टोला शरद पवारांनी लगावला.