परभणी : राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. 23 मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत तर यानंतर आठवी, नववीच्या शाळांत परीक्षांना प्रारंभ होणार आहे. मात्र असं असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक अजब निर्णय घेतला आहे. या निर्णय म्हणजे शिक्षणोत्सवचा. परीक्षा काळात प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर हा शिक्षणोत्सव घेण्याचे आदेश आणि त्यासाठी लागणारा निधी ही वितरित करण्यात आला आहे. मात्र परीक्षा काळात शिक्षण विभागातील सर्वच अधिकारी आणि शिक्षकांना या शिक्षणोत्सवासाठी विद्यार्थी येतील का असा प्रश्न पडला आहे.


राज्य शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत 2 मार्च रोजी एक जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर कशाप्रकारे शिक्षणोत्सव साजरा करायचा आहे याच्या गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे तालुका स्तरावरचा शिक्षणोत्सव 16 मार्चपर्यंत संपवायचा आहेत तर जिल्हास्तरीय शिक्षण उत्सव 20 मार्चपर्यंत संपवण्याचा आदेश जीआरमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असताना, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला आहे की परीक्षा घ्यायच्या की हे शिक्षणोत्सव.


असे करायचे आहे नियोजन!

- प्रत्येक तालुका स्तरावर एक दिवस हा शिक्षणोत्सव असेल तर जिल्हा स्तरावर दोन दिवस

- शिक्षणाच्या जनजागृतीसाठी एकूण 24 विषय यात ठेवण्यात येणार

- तालुक्याला 25 ते 30 स्टॉल उभारावे लागणार

- जिल्हा स्तरावर हेच स्टॉल 50 असतील

असे झाले निधीचे वितरण!

- प्रत्येक तालुका 50 हजार म्हणजेच 317 तालुक्यांकरता 1 कोटी 58 लक्ष एवढा निधी शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

- जिल्हा स्तरासाठी प्रत्येक जिल्ह्याला 3 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

- तालुका स्तरावर 16 मार्चच्या आधी हा शिक्षणोत्सव पार पडले पाहिजे

- जिल्हा स्तरावरील शिक्षणोत्सव 23 मार्चपर्यंत संपन्न झालाच पाहिजे

एबीपी माझाचे सवाल

- जो शिक्षणोत्सव दिवाळी किंवा शाळा सुरु झाल्यानंतर होतो, तो एवढ्या घाईत का?

- शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आदी यंत्रणेने परीक्षा घ्यायच्या का शिक्षणोत्सव?

- हा सर्व खटाटोप मार्च महिन्याच्या आधी निधी खर्च करण्यासाठी आहे?

- ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास सोडून या शिक्षणोत्सव येणे योग्य आहे का?