सातारा : दरवेळी पावसाळ्यात उघडले जाणारे कोयना धरणाचे दरवाजे यंदा उन्हाळ्यात उघडण्याची वेळ आली आहे. कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे कोयना धरणाच्या 6 दरवाजांपैकी एक उघडण्यात आला आहे.


मंगळवारी रात्री 10 वाजता कोयना धरणातून 900 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कर्नाटक सरकारसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार कृष्णेच्या पात्रातून कर्नाटकला 2.65 टीएमसी पाणी देण्यात येईल.

याच्या मोबदल्यात अलमट्टी धरणातून सोलापूर आणि सीमालगतच्या भागासाठी कर्नाटकाकडून पाणी घेतलं जाणार आहे. कोयनेतून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णेकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.