लातूर : राज्यात एक हजार मुलांमागे 60 मुली कमी आहेत. त्यामुळे पालकांनी मुलींच्या लग्नाची चिंता करू नये. उलट मुलांच्याच लग्नाचा विषय चिंतेचा आहे, असे सडेतोड मत प्रीती अंबेसंगे या मुलीने व्यक्त केलं. लातुरात शनिवारी झालेल्या लिंगायत समाजाच्या वधू-वर सूचक मेळाव्यात ही मुलगी बोलत होती.


मुलीच्या लग्नाच्या चिंतेने अनेक पालक हैराण असतात. मात्र या मुलीच्या भाषणानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 1 हजार मुलांमागे 940 एवढ्या मुली आहेत, त्यामुळे पालकांनी मुलीच्या लग्नाची चिंता करु नये, असं परखड मत या मुलीने व्यक्त केलं.

विकास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्यासह समाजातील आणि शहरातील अनेकांची यावेळी उपस्थिती होती. पाहुण्यांची भाषणं झाल्यानंतर संयोजकांनी विवाह नोंदणी केलेल्या मुला-मुलींना बोलण्याची संधी दिली.

मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं काम मुलीच्या आई-वडिलांनी करावं. आई-वडील आपल्या मुलीला रोपट्याप्रमाणे सांभाळतात. हे रोपटं मोठं झाल्यानंतर सासरच्या घरी जाऊन लावलं जातं. हे रोपटे कोमेजणार नाही, याची काळजी सासरच्या मंडळींनी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगत प्रीती अंबेसंगे हिने समाजातील कुप्रथांवरही झोड उठवली.

पाहा भाषणाचा व्हिडिओ :