सोलापूर : शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन केल्याचा प्रकार सांगोल्यातील चिकमहुद गावात घडला होता. सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांच्या या प्रतापाची दखल आता महिला आयोगाने घेतली आहे. जिल्हा हगणदारीमुक्त करण्याच्या प्रयत्नात आततायीपणा करु नये, असे महिला आयोगाने सुनावले आहे.


“जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या प्रयत्नात आततायीपणा करू नये. कारवाई करताना महिलेला शरम, लज्जा वाटेल असे प्रकार होऊ नयेत. अनेक अधिकारी स्वच्छ  भारत अभियान उत्तमपणे राबवित आहेत. हेतू आणि प्रयत्न चांगले असले, तरी महिलांविषयी  प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी.”, अशा सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.

त्याचवेळी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, संपूर्ण राज्यात हगणदारीमुक्तीची कारवाई करतेवेळी संवेदनशीलता बाळगावी.

काय प्रकरण आहे?

सोलापुरातील सांगोल तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून त्यांचे फोटो काढले. धक्कादायक म्हणजे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. राजेंद्र भारुड यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हगणदारीमुक्तीसाठीचे प्रयत्न स्तुत्य असले, तरी असा आततायीपणा योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता.