मुंबई : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणात खळबळजनक आरोप केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या राणे पितापुत्रांना कोर्टानं दिलेला दिलासा 15 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनाला राज्य सरकारच्यावतीनं जोरदार विरोध करण्यात आला आहे. तसं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांच्यावतीनं गुरूवारी दिंडोशी सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. दरम्यान राणे पितापुत्रांनी आपल्याविरोधात दाखल हा गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं दाखल करण्यात आल्याचा दावा करत तो रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियननं मालवणी येथील आपल्या राहत्या घरी 9 जून 20202 रोजी आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधानं केल्याबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश यांच्याविरोधात दिशाच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या दोघांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आलं होतं. यानंतर राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे. त्यावर न्यायालयानं मुंबई पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी आपली बाजू मांडताना राणे पितापुत्रांच्या अर्जाला तीव्र विरोध केला आहे. 


या प्रकरणातील चौकशीला उपस्थित राहत राणं पितापुत्रांनी त्यांच्याकडे दिशाबाबत पुरावे कोणाकडून प्राप्त केले? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसून केवळ उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे या दोघांच्या या प्रकरणाशी संबंध काय?, त्यांच्याकडे जर काही पुरावे आहेत तर ते कोणी दिले? याची चौकशी होणं गरजेचं आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी तपास होत असताना त्यांच्याकडील पुरावे ताब्यात घेण्यासाठी त्यांची पोलीस कस्टडी आवश्यक असल्याचा दावा यात पोलिसांकडून करण्यात आला आहे. जर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी आरोप केले असतील, तर ते कोणत्या उद्देशाने केले होते?, त्याबाबतही माहिती दिलेली नाही. 5 मार्च रोजी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या चौकशीदरम्यान, आपल्याकडे पुरावे असून ते इथं देणार नाहीत, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. ते प्रथमदर्शनी साक्षीदार नसतानाही त्यांना या प्रकरणाची माहिती कोणी दिली?, राणे हे लोकप्रतिनीधी असून ते आपल्या पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करून मृत्यूनंतर दिशाचं चरित्र्य हनन करणारे, खोटे आणि नराधार आरोप केल्यामुळे तिच्या कुटुंबियांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचंही पोलिसांनी म्हटलेलं आहे. तसेच राणे पिता-पूत्र कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करत असल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी आणि त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या युक्तिवादावर मंगळवारी होणा-या पुढील सुनावणीला राणेंकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांना कोर्टानं दिलेला दिलासा कायम राहील.


नारायण राणे आणि नितेश राणेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव
या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी रीट याचिका केली आहे. आम्हाला त्रास देण्याच्या आणि सामाजिक कार्यापासून वंचित ठेवण्याच्या राजकीय सूडबूद्धीने हा गुन्हा दाखल केल्याचा दावा राणेंनी केला आहे. तसेच अन्य एका प्रकरणात नितेश राणेला जामीन देताना कोणताही अन्य गुन्हा करू नये, अशी अट सिंधुदुर्ग न्यायालयाने घातली होती. त्याचा वापर करत राजकीय शत्रुत्वातून ही द्वेषयुक्त कारवाई करून आपल्याला नाहक त्रास देण्यात येत असल्याचंही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.