पंढरपूर : शरद पवार आणि प्रियांका गांधी यांनी 11 ऑगस्ट रोजी अयोजीत केलेल्या मेळाव्यास येऊ नये. हा राजकीय स्वार्थासाठी घेतलेला मेळावा असून धनगर समाज हा मेळावा उधळेल, असा इशारा समाजाचे नेते सुभाष म्हस्के यांनी दिला. आज धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी आणि राज्यभरातील समाजाच्या नेत्यांची पंढरपूर येथे बैठक झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेल्या 60 वर्षात समाजावर आरक्षण प्रश्नी अन्याय झाला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाजातील काही नेते धनगर आरक्षण प्रश्नाचा राजकीय लाभ उठवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे हा मेळावा उधळून लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


कॉंग्रेसमधील समाजाचे नेते आमदार रामहरी रुपनवर आणि राष्ट्रवादीमध्ये असलेले आण्णा डांगे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. आता धनगर समाजातूनच याला विरोध होऊ लागल्याने समाजात उघड पक्षीय फुट पडल्याचे चित्र आहे.

गेल्या आठ वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काचे आरक्षण लढा लढत आहे. केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत महाराष्ट्रातील धनगड या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे मात्र धनगर ही जमातच राज्यात आस्तित्वात नाही. असे असताना देखील महाराष्ट्रात धनगर समाजात आरक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. मागील अनेक वर्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सदैव धनगर समाजावर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते तरीही त्यांनी धनगर समाजाचा कधीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, असे धनगर नेते सुभाष म्हस्के यांनी म्हटले आहे.

सकल धनगर समाजाच्या या मेळाव्यास शरद पवार आणि प्रियांका गांधी येणार आहेत. जर या मेळाव्याला हे आले तर धनगर समाजातील युवकांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मेळाव्याचे आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले.

धनगर आरक्षण महामेळाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार रामहरी रुपनवर आणि  आण्णा डांगे यांनी काल बैठकीत दिली होती.  सध्या धनगर समाजातील अनेक नेते भाजपसोबत असल्याने आता हा समाज वंचितांच्या मागे न जाता आपल्यामागे यावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली असून आघाडीकडे असलेल्या धनगर नेत्यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेत दोन लाख समाजाच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये महामेळावा घेण्याची घोषणा केली आहे.

या मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा दावा करताना या मेळाव्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.