नागपूर : Bruck Pharma कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या माहितीवरुन चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतलं. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच वळसे पाटील यांनी फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा देखील दिला. या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात भाष्य केलं असून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हे सहन केलं जाणार नाही' : गृहमंत्री वळसे पाटील
फडणवीस यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षाचा आव्हानावर रेमडेसिवीर देणार असल्याने हे कुभांड रचले गेले. चौकशीला मी भीत नाही, जनतेसाठी कुठल्याही स्तरावर जायला तयार आहे. नवाब मालिकांच्या जावयावर नार्कोटिक्स कारवाई केली तेव्हापासून ते पिसाळलेल्यासारखे आरोप केंद्रावर करत आहेत. ते म्हणाले की, गृहमंत्री मॅच्युअर्ड आहेत पण त्यांना मला सांगावसं वाटतं की, ती कंपनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्यायला तयार होती. मात्र विरोधी पक्षाने त्यांना आवाहन केलं आहे एवढ्या करिता त्या ठिकाणी स्टोरी रचून त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आम्ही जाऊन पोलिसांना विचारलं यांच्याकडे साठा आहे का? यांनी कुठला गुन्हा आहे? का त्यावर उत्तर नाही असेच होते, असं फडणवीस म्हणाले.
'वळसे पाटील, तुम्ही कमिशनसाठी अडून बसला आहात!, गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही' : चंद्रकांत पाटील
ते म्हणाले की, चौकशीला मी घाबरत नाही. मी जनतेसाठी काम करतो. 36 केस अंगावर घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या हिताकरता मी कुठल्याही स्तरावर जाईल. राजकारण करण चुकीचं आहे. बातम्या पसरविले जात आहेत की, त्यांच्याकडे साठा होता तो त्यांनी दाखवावा. त्या ठिकाणी डीसीपींनी कबूल केलं की, कुठलाही साठा नव्हता, असं फडणवीसांनी सांगितलं.
नवाब मलिकांच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या जावयाला अटक झाली तेव्हापासून ते पिसाळल्यासारखे बोलत असतात. मला त्यावर काही बोलायचं नाही, त्यांना उत्तर द्यायचं नाही, त्यांचं उत्तर केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आहे.
आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत फडणवीस म्हणाले की, त्यांची रात्रीची उतरली नसेल आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल. त्यांना मला एकच विनंती करायची आहे कोरोनाचे किटाणू माझ्या घशात घालताना नीट ग्लोज आणि मास्क घालावा. कारण मला जनतेचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे मला काही होणार नाही पण तळीराम लोकांना कोरोना लवकर होतो, असं ते म्हणाले.