Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणल्यानंतर या योजनेला राज्यातील महिलांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेतील पहिले दोन हफ्ते जमा झाल्याने महिलांमधील आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय महायुतीकडून लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा घेतला जात आहे. मात्र, या योजनेमध्ये पात्र महिलांपेक्षा सक्षम महिलांनी सुद्धा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामधील कार्यक्रमा बोलताना ज्या महिलांनी सक्षम असूनही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे चांगलेच कान टोचले. 


त्यांनी एका ठिकाणाचे नाव न सांगता महिलांनी कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे याचं उदाहरण दिलं. अजित पवार म्हणाले की एका महिलेला ऊस किती जातो, असे विचारले असता तिनं सांगितले की 500 ते 600 टन जातो, असं सांगितलं. यावेळी दादांनी उत्तर कपाळालाच हात लावला. ते पुढे म्हणाले की, या योजनेचा उद्देश अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांसाठी तर ज्या महिला रोजंदारीवर काम करतात. धुणी भांडी करतात किंवा जेवण वगैरे करून देण्याचं काम करतात अशा महिलांसाठी योजना आणली होती. मात्र, या योजनेमध्ये सक्षम असणाऱ्या महिलांनी सुद्धा लाभ घेतल्याने चांगलेच कान टोचले. 


अजित दादांनी द्राक्ष बागायतदारांची घेतली फिरकी


महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या परिषदेत अजित पवारांनी आयोजकांची चांगलीच फिरकी घेतली. सत्कारावेळी प्रायोजकांना बेदाण्याचे पॅकेट द्यायचं ठरलं होतं, मात्र ते का दिलं नाही? जे ठरलं होतं, ते द्यायला हवं होतं. किती चेंगटपणा करता राव. असं म्हणत अजित दादांनी त्यांच्या खास शैलीत आयोजकांची खेचली. माझ्याकडे मागण्या करताना भसाकभर मागताय अन द्यायचं म्हटलं की चेंगटपणा करता, असं कुठं असतं का? अशी मिश्किल टिपणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. त्याचवेळी तुम्ही बागायतदार शेतकरी असताना, तुमच्या कुटुंबातील महिलांनी 'लाडकी बहीण योजने'चा लाभ घेतल्याचं कबूल केलं. प्रत्यक्षात ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. असं म्हणत अप्रत्यक्षपणे बागायतदार शेतकऱ्यांचे कान ही दादांनी टोचले. 


दरम्यान, लोकसभेत शेतकऱ्यांनी कंबरडे मोडल्याची कबुली स्वतः अजित पवारांनी दिली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित दादा नरमाईच्या भूमिकेत दिसून आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या द्राक्ष परिषदेत याचीच प्रचिती आली. अलीकडे तरुणांचा कल शेतीकडे वाढल्याचं अन टोपीवाले शेतकरी रोडावल्याचं दिसून येतं. इथंही मला टोपीवाले मोजकेच शेतकरी दिसले. आता म्हणाल मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देतो. बाबांनो मला टोपीवाले अन बिन टोपीवाल्या शेतकऱ्यांचीही गरज आहे. असं अजित पवारांनी आवर्जून नमूद केलं.


इतर महत्वाच्या बातम्या