नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची (Nashik Rain Update) संततधार सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विसर्ग सुरु असल्याने गोदावरीची पूरस्थिती (Godavari Flood) कायम आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाकाठावरील मंदिर आजही पाण्याखाली आहेत. तर गोदामाईने नारोशंकराला जलाभिषेक घातला आहे. सलग तीन दिवसापासून पूर असल्याने गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस असल्याने 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


आज सकाळी गंगापूर धरणासह पालखेड, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरण ८९.८४ इतके टक्के भरले असून धरणातून सकाळी 6 वाजता 8 हजार 428 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी 9 वाजता हा विसर्ग 1204 क्यूसेकने कमी करून एकूण ७ हजार 224 क्यूसेकने सोडण्यात आले असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्याटप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे.


दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी? 


या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदाकाठावरील छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.तसेच या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे. आज सकाळी दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहचले होते. मात्र आता एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. 


दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना 


दरम्यान, नाशिक शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी होळकर पुलावर जाऊन पाणी पातळीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून नागरिकांनी सहकार्य करत खबरदारी घेण्याचे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले.



पुरामुळे जनजीवन विस्कळीत 


तर गोदावरी नदीला आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. गोदा काठावरील भाजीपाला, पूजा साहित्य आणि इतर विक्रेत्यांचे हाल होताना दिसून येत आहे. गोदाकाठावरील टपऱ्या भांडी बाजार, सराफ बाजारात हलविण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध दोन ते तीन दिवसांपासून टपऱ्या ठेवल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही सूचना दिल्या नसल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे. 


त्र्यंबकेश्वरला भाविकांची गैरसोय 


त्र्यंबकेश्वरसह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लोक अक्षरक्ष: हैराण झाले आहेत. तर त्र्यंबक शहरात रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने शहराला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज चौथा श्रावणी सोमवार असल्याने त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय ग्रामीण भागात काल रात्रीपासून मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे वाहत असल्याने अनेक घरांचे पत्रे आणि भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.


नांदूरमध्यमेश्वरमधून किती विसर्ग? 


दरम्यान, आज सकाळी 9 वाजता दारणा धरणातून 2 हजार 058 क्यूसेकने विसर्ग कमी करून एकूण 10 हजार 120 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच कडवा धरणातून सकाळी 10 वाजता 1 हजार 022 क्यूसेकने विसर्गात वाढ करून एकूण 4 हजार 132 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर नांदूरमधमेश्वर धरणातून सकाळी 9 वाजता पाण्याचा विसर्ग 62 हजार 371 क्यूसेक होता. त्यानंतर सकाळी 10 वाजता त्यामध्ये 6 हजार 996  क्यूसेकने वाढ करुन एकूण 69 हजार 367 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय पालखेड धरणातून सकाळी 6 वाजता 6 हजार 220 क्युसेकने विसर्ग कमी करून एकूण 20 हजार 890 क्यूसेकने कादवा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  


आणखी वाचा  


Nashik Rain : नाशकात दम'धार', इगतपुरीत अनेक घरात शिरलं पाणी, त्र्यंबकलाही झोडपलं; गंगापूर, दारणातून विसर्ग सुरु