Mumbai to delhi highway : दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे काम सध्या सुरु असून काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासांत पार करता येणार आहे. तसेच हायवेमार्गे अवजड वाहने शहराच्या बाहेरुन मार्गस्थ होणार असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्ट्याच्यावतीने आयोजित स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमालेमध्ये नितीन गडकरी यांनी ऑनलाईन हा संवाद साधला


यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना वाहतूक व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांबाबत माहिती दिली. यावेळी संवाद साधताना गडकरी यांनी मुंबईनजीक नवी मुंबई येथे विमानतळ होत आहे, त्या दृष्टीने वॉटर टॅक्सी हा प्रकल्प तयार केला आहे. दक्षिण मुंबईतील लोकांना यामुळे आठ सीटर वॉटर टॅक्सीतून 13 मिनिटांत नवी मुंंबई एअरपोर्ट गाठता येणार असल्याचं ते म्हणाले.


पुढे बोलताना गडकरी यांनी देशाला पुढे नेण्यासाठी उद्योग आणि शेती अधिक विकसित करावी लागेल. त्यासाठी पाणी, इंधन, वाहतूकीची साधणे आणि कम्यूनिकेशन यात नवनवे प्रयोग करावे लागतील. रस्ते आणि रेल्वे वाहतूकीपेक्षा जलवाहतूकीचा खर्च कमी आहे. ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल  सीएनजी इंधनावर चालणारी वाहने तयार करण्यासाठी विविध कंपन्या पुढे येत आहेत. याशिवाय ई वाहनामुळे प्रति किलोमीटर प्रवास खर्च कमी होईल. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केले जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळेची आणि पैशाची बचत होईल, असं गडकरी म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha