मुंबई : सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील भीषण पूरपरिस्थितीला आपल्याच राज्यातील मोठी धरणे आणि त्यासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी तसा थेट आरोप केला आहे. राज्यातील कोयना धरणासह कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि राधानगरी या मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याचं नियोजन पूर्णपणे भरकटलेलं होतं, त्यामुळेच सांगली-कोल्हापूर या दोन महानगरांना पुराचा तडाखा बसला असं माधव गाडगीळ यांनी सांगितले.


SANDRP म्हणजेच South Asia Network on Dams, Rivers, and People दक्षिण आशियातील धरणे, नद्या आणि लोकजीवन यांविषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासगटाच्या काल (सोमवारी) प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगली-कोल्हापूरच्या पुरासाठी राज्यातील धरणांच्या बेजबाबदार विसर्ग व्यवस्थापनावर बोट ठेवण्यात आले आहे. SANDRP च्या अहवालातील निष्कर्षानुसार, पावसाळा मध्यावर असताना तसेच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना धरणं काठोकाठ भरून ठेवणं, अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा येण्यापूर्वीच राधानगरी, कोयना किंवा वारणा यांसारखी धरणे बऱ्यापैकी भरलेली होती. त्यावेळी या धरणातून काहीच विसर्ग करण्यात आला नाही. अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरल्यानंतर मात्र या मोठ्या धरणांमधून ऐनवेळी मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला, यामुळेच सांगली-कोल्हापूर पाण्याखाली गेल्याचा निष्कर्ष एसएएनडीआरपीने काढला आहे.

एसएनएनडीआरपीचा अहवाल पूर्णपणे वाचला नसला तरी त्याचा गोषवारा आपण पाहिल्याचे सांगून गाडगीळ यांनी या अहवालातील निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केले आहे. माधव गाडगीळ हे पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास गटाचे प्रमुख आहेत.

वारणा, राधानगरी आणि कोयना या धरणांतून योग्य वेळी थोडा थोडा पाण्याचा विसर्ग केला असता, तर महापूर नक्कीच टाळता आला असता असेही गाडगीळ सांगतात. धरणावरचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे किंवा धरणातल्या पाणी विसर्गाचं नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सरकारला योग्य वेळी योग्य माहिती न दिल्यामुळे हा अनर्थ घडला असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

गेल्यावर्षी केरळमध्ये आलेल्या विध्वंसकारी महापुरालाही तिथल्या धरणातील पाण्याचा बेजबाबदार पद्धतीने केलेला विसर्गच कारणीभूत होता, याची आठवण माधव गाडगीळ यांनी करुन दिली.