रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांचा विचार करता किमान रोज 20 नव्या रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांचा इतिहास देखील जिल्ह्याबाहेरील प्रवासाचा आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा रूग्णालय हे कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण, सध्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता आता रत्नागिरी शहराजवळील कुवारबांव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुवारबांव येथील सामाजिक न्याय भवन येथे हे सेंटर उभारले जाणार आहे. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रूग्णांना या नवीन कोविड केअर सेंटर दाखल केले जाणार आहे. या नव्या कोविड रूग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून चार स्टाफ नर्स देखील नियुक्त केल्या आहेत. शिवाय, अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांवर उपचार करणे सोपे होणार आहे.


कोरोनावर मात करत डॉ. दिपाली पुरी पुन्हा रुग्णसेवेत रुजू

काय आहे जिल्ह्याची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज रोजी 287 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 100 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा विचार करता एक महिन्यापूर्वी म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 होता. या सर्वांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर मात्र कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत गेला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 287 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आढळून आलेले बहुतांश रूग्ण हे जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. आजघडीला जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या ही 1 लाखाच्या पार गेली आहे. तर 90 हजार पेक्षा जास्त रूग्ण हे होम क्वॉरंटाईन आहेत. तर 186 जण हे संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला किती जणांचा प्रतिसाद? लॉकडाऊनच्या काळात भाड्यात कुणी सवलत देईना