लसीकरणाचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यास 1 मार्च पासून संपूर्ण देशात सुरुवात झाली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुतांश जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्याला नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात लसीकरणसाठी नोंदणी राज्यभर केल्याचे चित्र आढळून आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र लसीकरणसाठी असलेल्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक नागरिक अनेक तास केंद्रांवर तसेच बसून होते. अनेकांना लस न घेता परतावे लागले तर काहींना केंद्रावरील अभूतपूर्व गोंधळाचा सामना करावा लागला. वैद्यकीय तज्ञांच्या मते, लसीकरणासाठी जाऊन कोरोना होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वयस्कर आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी इतकी गर्दी एकाच वेळी केल्यास त्यांना इतर आजरांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी जात असताना नोंदणी व्यवस्थित करूनच आणि संबंधित कागदपत्रांसोबत घेऊन, सुरक्षिततेचे नियम केंद्रावर पाळणे गरजेचे आहे. विशेष करून मास्क लावणे, सॅनिटायझरने हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे.


लसीकरणाचा पहिलाच दिवस असल्याने केंद्र सरकारने जी लसीकरणासाठी सेंटर जाहीर केली होती. त्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसत होते. त्यांना आलेल्या नागरिकांना व्यवस्थित नागरिकांना माहिती देता येत नव्हती. काही नागरिकांना अनेक वेळा नोंदणी करून सुद्धा नोंदणी होत नसल्याचा अनुभव आला. काही केंद्रांवर लस पोहचली नव्हती. लस घेण्यासाठी सोयीचे केंद्र निवडल्यावर त्या ठिकाणी लस उपलब्ध नव्हती तर वेळेच्या बाबतीतही सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ दाखवली जात होती.


याप्रकरणी, श्वसनविकार तज्ञ डॉ. समीर गर्दे सांगतात की, " दुसऱ्या टप्प्यात ज्या नागरिकांनी लस घ्यायची आहे ह्या सर्व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अगोदरच कमी असते. त्या लोकांनी खरं गर्दीपासून दूर राहणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत हे सर्व नागरिक जर केंद्राच्या आवारात ज्या पद्धतीने गर्दी करून आहेत त्यामुळे त्याच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने मुळात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची केंद्र वाढविण्याची गरज आहे. कारण ह्या सगळ्या प्रकारात पहिल्या टप्प्यातील अनेकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील फ्रंट लाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या लस या मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाय म्हणजे केंद्राची संख्या वाढविणे आणि लसीकरणाची प्रक्रिया सुलभ कशी करता येईल यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे."


तसेच या दुसऱ्यात टप्प्यात 27 कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरण केंद्रासाठी खासगी आणि सरकारी केंद्राची यादी जाहीर केली असली तरी ती केंद्र कमी असून नागरिकांसाठी सोयीची आहेतच अशी नाही. अनेक केंद्र काही नागरिकांच्या घरापासून दूर आहेत. विशेष करून याची दाहकता ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे विक्रेंद्रीकरण करून छोट्या रुग्णालयात ही लस देता येईल याचा विचार शासनाने केला पाहिजे असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांच्या मते, " दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्या दिवसाचे चित्र खूपच विदारक होते. लसीकरणसाठी गेलेले जेष्ठ नागरिकांना या गर्दीमुळे कोरोना होईल की काय अशी परिस्थिती काल राज्यातील सर्वच केंद्रावर होती. को-विन 2.0 हे पोर्टल हा लसीकरणाला मधील मोठा अडथळा दूर होणे गरजेचे आहे. या टप्प्यातील नागरिकांनी थेट संबंधित कागदपत्र घेऊन केंद्रावर जाणे अपेक्षित आहे. त्यांना या करता जवळच्या केंद्रावर जाऊन वेळ घेणे बंधनकारक करून सोप्या पद्धतीने लसीकरण केले पाहिजे. को विन पोर्टल ठेवून ते अधिक सोपे कसे करता येईल याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर केंद्राची संख्या वाढली पाहिजे, लोकांना विनाअडथळा सोप्या पद्धतीने सुरक्षित वातावरणात लस मिळणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. "


संबंधित बातम्या :