Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात एक हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  आजपर्यंत एकूण 77,37,355 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.06% एवढे झाले आहेत. राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजार 127 इतकी झाली आहे. ओमायक्राॅन व्हेरीयंटचे बीए४ आणि बीए५ सब-व्हेरीयंटचा वेगाने प्रसार होत असल्याचं तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवलेय. 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्ण आहे. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत आज 763 कोरोना रुग्न आढळले आहेत. तर ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 


केंद्रीय आरोग्य सचिवांकडून राज्य आरोग्य सचिवांना पत्र लिहित काळजी घेण्याच्या सूचना 
राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त आहे. त्यामुळे केद्र सरकारने राज्याला पत्र पाठवत या जिल्ह्यात टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिलाय. केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास याना पत्र पाठवले आहे. कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने  राज्य  सरकारला पत्र पाठवले आहे. मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे पुणे रायगड,पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात नमूद केलेय. या जिल्ह्यात टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आलेय.