मुंबई : संपूर्ण जभरात महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा महाराष्ट्रातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच पुणे, मुंबई आणि नागपुरमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 11 कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी राज्यातील शायकीय कार्यक्रमांसोबतच इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.


#CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द


पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू


जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून यावर उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा कायदा लागू केला असून यामुळे गर्दीचे ठिकाण, देवस्थान तसेच इतर महत्त्वाचे नसलेले अनेक सार्वजनिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात महत्त्वाचा असलेला बोहाडा हा आनंदोत्सवही मर्यादित केला जाणार आहे. या उत्सवात आदिवासी समाजातील पारंपरिक वाद्यांच्या तलावर आदिवासी समाजातील देवदेवतांचे मुखवटे घालून हे मुखवटे नाचवण्याची अनोखी प्रथा आहे. या उत्सवाला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक आदिवासी बांधव आवर्जून हजेरी लावतात. मात्र यावेळी कोरोना व्हायरसमुळे या उत्सवावर ही विरजण पडले असून त्यामुळे हा उत्सव आता मर्यादित साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


पाहा व्हिडीओ : Coronavirus Outbreak | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन शनिवारपर्यंत आटोपण्याचा प्रयत्न



वसईला होणार मुस्लिम धर्मियांच 'तब्लीगी इज्तेमाच' कार्यक्रम पुढे ढकलला


वसईच्या सनसिटी ग्राउंडवर 14 आणि 15 मार्चला मुस्लिम धर्मियांच 'तब्लीगी इज्तेमाच' भव्य कार्यक्रम होणार होता. मात्र करोना वायरसमुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला मान देवून, हा कार्यक्रम पुढे ढकला आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी पुढची तारीख ठरवली आहे. आज माणिकपुरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना भेटून, शमीम एडुकेशन अँड वेल्फर सोसाइटीच्या सभासदांनी तसं पत्र पोलिसांना दिलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून जवळपास लाखभर मुस्लिम बांधव हजेरी लावतात.


चंद्रपूरची देवी महाकाली यात्रा रद्द


चंद्रपूरची देवी महाकाली यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाकाली मंदिर ट्रस्ट यांच्यात बैठक पार पडली. यावेळी धार्मिक विधी पार पडणार असून यात्रेचं आयोजन करण्यात येणार नाही. कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शेजारील अनेक राज्ये आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात. यंदाची यात्रा 30 मार्च पासून सुरू होणार होती. मात्र भाविकांनी चंद्रपुरात येऊ नये असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.


पाहा व्हिडीओ : हात स्वच्छ धुताना काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा मोलाचा सल्ला



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतही काळजी


कोरोनाचा फटका शिर्डीतही दिसून येत आहे. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कमी झाली आहे. गुरूवार असतानाही दर्शनाच्या रांगा ओस पडल्या होत्या. साईबाबा संस्थानकडुन नॉन कनेक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरच प्रात्यक्षिक करून घेण्यात येत आहे. दर्शनरांगेत प्रवेश करताना थर्मामीटरने भाविकाची तपासणी करण्यात येणार आहे. लवकरच अधिकृतपणे यंत्रणाही सज्ज करण्यात येणार आहेत. संस्थानकडून साफसफाई, हॅन्ड सँनिटायझर तसेच लवकरच थर्मामीटरने तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना संशयित रुग्णांसाठी साईबाबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.


कोरोनामुळे राज्य सरकारचा लावणी महोत्सव पुढे ढकला; लावणी कलावंत आणि रसिकांची मागणी


कोरोना व्हायरसची दहशत आता महाराष्ट्रमध्येही दिसू लागली असून यामुळेच 14 ते 18 मार्च या कालावधीत जयसिंगपूर येथे राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणारा लावणी महोत्सव पुढे ढकलण्याची मागणी लावणी कलावंत आणि रसिकांनी केली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे राज्यातील जत्रा, यात्रा, सभा, संम्मेलन, मोर्चे यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना हा लावणी महोत्सव देखील रद्द न करता पुढे ढकलण्याची मागणी कलावंत करीत आहेत. कोरोनाची भिती सर्वसामान्य लावणी कलावंत आणि रसिकांना देखील वाटत असल्याने ही मागणी होत आहे. वास्तविक बऱ्याच वर्षाच्या खंडानंतर यंदा आघाडी सरकारने हा लावणी महोत्सव आयोजित केला होता.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासींचा बोहाडा उत्सव मर्यादित करणार


पालघर जिल्ह्यात पारंपरिक बोहाडा उत्सवाला विशेष महत्व आहे. दरवर्षी होळीनंतर जिल्ह्यातील अनेक गावांत हा उत्सव साजरा करण्यात येतो, मात्र यावर्षी कोरोनोमुळे या उत्सवावरही संक्रांत ओढवली असून हा उत्सव मर्यादित करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे उत्सवाला सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपला बोहाडा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्सवादरम्यान बाहेरून येणारी फिरतीची दुकाने, पाळणे आणि यात्रेसाठीच्या इतर आयोजनांवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. केवळ बोहाड्याचा मुलभूत भाग असणारी सोंगे पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहेत. बाहेरगावच्या मंडळींना व विषेशतः नाशिक, पुणे व मुंबईच्या भाविकांना शासनातर्फे तसेच बोहाडा यात्रोत्सव समितीतर्फे सुचित करण्यात येते की, आपण शक्यतो यंदाचे वर्षी बोहाडा उत्सवाला येण्याचे टाळावे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा


Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!


Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल