Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. भारनियमनाचे संकट आणि केंद्रीय यंत्रणांचा होत असलेला गैरवापर यावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. मंत्रींमडळ विस्ताराबाबत कोणताही चर्चा झाली नाही. त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या हायकमांडला आहे. त्याबाबत ते निर्णय घेतील असे पटोले म्हणाले.


सध्या महाराष्ट्रावर भारनियमनाचे संकट आले आहे. यावर शरद पवार यांनी हस्तेक्षेप करावा, असेही पटोले म्हणाले. महाराष्ट्राला अंधारातून वाचण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावेत अशी माहिती यावेळी पटोले यांनी दिली. आज मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात आहे, शरद पवार हे देखील सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं आणखी दोन दिवसानंतर आम्ही दौऱ्यावरुन आल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. यावेळी आम्ही विविध मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. राज्यामध्ये सध्या लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहे हा प्रश्न तातडीने कसा निकाली काढता येईल याचसोबत केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच भाजपला कसे उत्तर द्यायचे याबाबत येत्या एक ते दोन दिवसात चर्चा करु असेही पटोले म्हणाले. महामंडळ वाटपावर देखील चर्चा झाली. दोन ते तीन दिवसात आम्ही एकत्र येऊ आणि मग चर्चा करु असे त्यांनी सांगितले.


दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी आयएनएस विक्रांतच्या मुद्यांवर भाजपवर देखील निशाणा लगावला. आयएनएस विक्रांतचा पैसे गेले कुठे याचे उत्तर भाजपने द्यावे, असेही पटोले म्हणाले. बिषयाला बगल देण्याची भाजपची जुनी सवय आहे. तो पैसा नेमका गेला कुठे हे संजय राऊत यांनी सांगितले आहे.


दरम्यान, राज्यात आपत्कालीन भारनिमयन सुरु करण्यात आले आहे. लोडशेडींगचे वेळापत्रकाबाबत अद्याप नियोजन झालेले नाही. सध्या आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला लागू करण्यात आला आहे. एकीकडे उन्हाळा मी मी म्हणत वाढत असताना दुसरीकडे राज्यावर भारनियमनाचं संकट उभं ठाकलंय. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातल्या वीजेच्या मागणी-पुरवठ्याबाबत परिस्थितीची माहिती दिली आणि भारनियमनाचा इशाराही दिलाय. या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी आपत्कालीन कराराद्वारे 800 ते 1 हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याबाबत आज तातडीची बैठक होणार आहे. उन्हाळ्यात राज्यातली वीजेची मागणी वाढतेय. मात्र कोळसाटंचाईमुळे वीजेचं उत्पादन वाढवण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळं वीजेच्या मागणी-पुरवठ्याचं संतुलन डळमळीत होत आहे. दरम्यान, आपत्कालीन वीज खरेदी करण्याबाबत आज पुन्हा मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.