शिर्डी : मुलगी म्हटलं की आजही अनेकांना तिच्या लग्नाची चिंता सतावते. आजही हुंडा द्यायची परिस्थिती नाही म्हणून कुठे मुलींच्या आत्महत्यांच्या घटना समोर येतात तर कुठे मुलीच्या पालकांच्या. मात्र गेल्या 18 वर्षांपासून साईबाबांच्या शिर्डीत आपल्याला मुलगी नसल्यानं कन्यादान करण्याचं स्वप्न मनाशी बाळगून आतापर्यंत अठराशेहून अधिक मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून देण्याचे काम शिर्डीचं कोते दाम्पत्य करत आहे.




दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कैलास कोते यांनी स्थापन केलेल्या साई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा पार पाडत असून काल झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या 55 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले, ते ही अवघ्या सव्वा रुपयात.

कैलास कोते

शिर्डी शहरातील कोते दाम्पत्य. परिवारात पती पत्नी आणि दोन मुलं. समाज सेवा करण्याची सवय असल्यान कैलास कोते यांनी अठरा वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळा करण्याच मनाशी ठरवत सामुदायिक विवाह सोहळा संकल्पना सुरु केली आणि यासाठी साई चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला. या अंतर्गत गेल्या 18 वर्षापासून सुरु असलेल्या या सोहळ्यात अवघा सव्वा रुपया घेत आतापर्यंत 1800 हून अधिक सोहळे पार पाडत कन्यादान केलं आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साईंच्या शिर्डीत काल संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात 55 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत.  राज्यभरातून आलेल्या वऱ्हाडी मंडळाची रेलचेल आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा दिमाखदार सोहळ्यात हा विवाहसोहळा संपन्न झाला.

कोते दाम्पत्याकडून केवळ लग्नच लावून दिले जात नाही तर जोडप्यांना जर मुलगी झाली तिच्या नावे दहा हजार रुपयांची पावती बँकेत करण्यात येते. ज्यांना आधार नाही अशांना साईंचा संदेश घेत आधार देण्याचा छोटा प्रयत्न करीत असल्याची भावना कैलास कोते यांनी बोलून दाखविली. तर 18 वर्षात 1800 मुलींचे कन्यादान करण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुमित्रा कोते यांनी दिली आहे.

या सोहळ्याच्या वेळी हुंडा विरोधी प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले होते.  इंग्लंड येथील वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या संस्थेने या विवाह सोहळ्याची दखल घेत कोते दाम्पत्याला प्रमाणपत्र दिले आहे.

इंग्लंड येथील वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या संस्थेने या विवाह सोहळ्याची दखल घेत कोते दाम्पत्याला प्रमाणपत्र दिले.

यावर्षी पडलेला भीषण दुष्काळ पाहता सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचं असून कोते दाम्पत्यांनी सुरु केलेला उपक्रम राज्यातील अनेकांसमोर आदर्श निर्माण करणारा आहे.