CM Eknath Shinde : या लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) कांद्यामुळे (Onion) आम्हाला थोडा त्रास झाला. कांद्यानं थोड रडवले. तसेच मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) यामुळं देखील थोडा त्रास झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं, परंतू, आचारसंहिता लागल्यानं त्याचं वाटप करता आलं नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.  
शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक आयोजीत केली होती, यावेळी ते बोलत होते. 


वेळेची बचत व्हावी म्हणून मी गावी हेलिकॉप्टरने जातो 


निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं. पण सध्या राज्यात पावसाला चांगली सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या  बैठकीचा विषय गंभीर होता, त्यामुळे मी स्वतः हजर राहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी मी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो, काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, पण वेळेची बचत व्हावी यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो असे मुख्यमंत्री म्हणाले. 


तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणं गरजेचं


बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचं ठरवल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते. एका विचारधारेचं सरकार येणं गरजेचं होतं. त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना विचारधारेची नवीन सरकार आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला. कांद्याने थोडं रडवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  तर मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस यामुळं थोडा त्रास झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं. परंतू, आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांची वेळ घेणार, राज्यातील समस्या मांडणार


काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं. 400चा नारा सुद्धा देण्यात आला, हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्र्यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.