मुंबई : फवारणीचं चुकीचं मिश्रण बनवणाऱ्या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यवतमाळमधील कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. फवारणीमुळे यवतमाळ, अकोला आणि नागपूरमध्ये मिळून तब्बल 34 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. त्यानंतर सरकारनं ही घोषणा केली. ज्यांनी विषारी कीटकनाशकांची विक्री केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
चायनीज फवारणी यंत्रावर बंदी घातल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कृषीपंपांचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी निधीची तरतूद करण्यासोबतच विदर्भ व मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप ऊर्जीकरणाच्या विशेष योजनेलाही आज मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.
फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या :