Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत. 


रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.


चिपळुणासाठी तातडीनं मदत पाठवा : विनायक राऊत 


चिपळुणासाठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी खासदार विनाय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणं शक्य नसल्यानं कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणीही विनायक राऊतांनी केली आहे. 2005 नंतर असा पाऊस कोकणात कधीच पाहिला नव्हता, असंही खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.


चिपळूणसाठी सरकारचा रेस्क्यू प्लॅन तयार :



  • रत्नागिरीहून चिपळूणसाठी स्पीड बोट रवाना 

  • एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीम थोड्याच वेळात चिपळूणात दाखल होणार 

  • कोस्ट गार्डचा हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करणार 

  • पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था करणार 

  • जिवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश 

  • कोकणातले सर्वच महत्वाचे नेते चिपळुणात होणार दाखल


रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरातही मुसळधार 


रत्नागिरीत लांजा परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे काजळी आणि मुचकुंदि नदीला पूर आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिश पुलावरील वाहतूक पहाटेपासून बंद करण्यात आली आहे. लांजा शहरातील हॅप्पी ढाबा पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील भांबेड ते वेरवली कोंडला जोडणारा फुटब्रीज पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. तर वेरवली कोंड मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :